मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी सुशोभीकरणाचा प्रकल्प ऑक्टोबर २०२२पासून सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात मोकळ्या जागा, वाहतूक बेटे, उद्याने, पदपथ, विजेचे खांब, रस्ते, पादचारी पूल, उड्डाणपूल, पदपथ, स्कायवॉक, समुद्रकिनारे, उद्याने, पर्यटनस्थळे या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, हरितीकरण आणि आकर्षक प्रकाशयोजना आदींचा समावेश असणारी, दीर्घकालीन गुणवत्तेची १७ निरनिराळ्या प्रकारातील कामे होत आहेत. ही कामे करताना कलात्मक गोष्टींसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करून घेण्यात आला आहे. यांत्रिकी व विद्युत विभागाने १३ स्कायवॉकचे विद्युत सुशोभीकरण पूर्ण केले आहे.
या सर्व ठिकाणी तसेच अनेक भागातील झाडांवर मोठ्या प्रमाणावर विजेची रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मुंबईत आधीच रस्ते, पदपथ, व्यावसायिक कार्यालयांच्या इमारतींवर कायमस्वरूपी रोषणाई तसेच या ठिकाणी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. मुंबई रात्रीच्या वेळेस कायम झगमगत असते. सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत अतिरिक्त रोषणाई होत असल्याने या झगमगाटात आणखी भर पडली आहे. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून विजेचा वापर वाढला असून पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त वीज बिलाचा भार पडतो आहे. पालिकेला ही रोषणाई कायमची शक्य आहे का, असा प्रश्न विचारला जातो आहे.
वीज मागणी आणि पुरवठा
उन्हाळ्यातील मुंबईची कमाल वीज मागणी सरासरी २८०० ते ३००० मेगावॉट इतकी असते. मुंबईसाठी दररोज निर्माण होणारी वीज १३०० मेगावॉट आहे. मागणी वाढल्यास अतिरिक्त वीज टाटा आणि अदानी कंपनीकडून उपलब्ध करून घेतली जाते. उन्हाळ्यात सर्रास मागणी वाढत असल्याने वीज कंपन्यांना बाहेरून महागड्या दराने वीजखरेदी करावी लागते. त्यामुळे कंपन्या ग्राहकांकडून इंधन समायोजन आकाराच्या रूपाने ते पैसे वसूल करतात. आधीच मागणीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पुरवठ्यात तुटवडा आहे. त्यात शहरातील वाढत्या रोषणाईचा भार कशासाठी, असा सवाल केला जात आहे. रोषणाईचा हा झगमगाट कायमचा ठेवणार असल्याचे अलीकडेच सरकारने म्हटले आहे. मुंबईत आधीच विजेची मागणी प्रचंड असून ती पूर्ण करण्यासाठी विविध वीज कंपन्यांकडून अतिरिक्त वीज घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर कोट्यवधीचा हा झगमगाट मुंबईला किती काळ परवडणार, असा सवाल केला जात आहे.
काही भागांत रोषणाई बंद
पालिकेने केलेली रोषणाई काही भागात बंद पडल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. पूर्व मुक्त मार्गालगत चेंबूर परिसरात लावलेले लामणदिवे बंद पडले आहेत. कुर्ला, विक्रोळी पट्ट्यातही काही भागांत रोषणाई बंद असल्याचे आढळून आल्याचे मुंबईकरांनी सांगितले. पावसाळ्यात रोषणाई टिकत नसल्याचे मुंबईकरांचेम्हणणे आहे.
सुशोभीकरण प्रकल्पात आजवर एकूण कामांचे कार्यादेश- १,१९६
९५१ कामे पूर्ण झाली आहेत.
शहर विभागांत २८९ कामे पूर्ण
उपनगरांमध्ये ६६२ कामांचा समावेश
सुशोभीकरण प्रकल्पावर आजपर्यंत खर्च ६१७ कोटी
सन २०२२-२०२३ मध्ये ४९९ कोटी ८८ लाख रुपये
सन २०२३-२०२४ मध्ये ११७ कोटी ७९ लाख रुपये
आतापर्यंत देण्यात आलेली बिले ४५०