पुणे : मंचर ओलांडून नाशिकच्या दिशेने प्रवास सुरू झाला की रस्त्याच्या दुतर्फा टोमॅटोचे क्रेट घेऊन जाणाऱ्या वाहनांची वर्दळ दिसायला लागली की ओळखायचे नारायणगाव आले! देशातील टोमॅटोच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये जिल्ह्यातील नारायणगावाचा समावेश होतो. जुन्नर, आंबेगाव तालुक्यांना लाभलेले पोषक हवामान, सुपीक जमीन अन् समाधानकारक जलसंपत्तीमुळे टोमॅटो उत्पादनात या प्रदेशाने बाजी मारली आहे.

विशेष म्हणजे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशपासून ते ओडिशातील व्यापारी टोमॅटोसाठी आजही नारायणगावमध्ये येतात. महाराष्ट्रात पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. देशात टोमॅटोचा हंगाम नसतो, त्यावेळी देखील नारायणगाव आणि लगतच्या प्रदेशात टोमॅटोची शेती सुरू असते.

Ajit Pawar Meeting: अजितदादांच्या बैठकीत खुर्च्यांची संख्या घटली? चर्चांना उधाण, एमईटीमध्ये राष्ट्रवादीचे किती आमदार येणार?
वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत नारायणगाव पट्ट्यातील टोमॅटो इतर शेतमालाबरोबर जुन्या पुणे-मुंबई महामार्गाबरोबर मुंबईला जात असे. पुढे हे क्रेट वेगवेगळ्या राज्यांच्या दिशेने रवाना होत. पण माल नाशवंत असल्याने मुंबई महामार्गावर किंवा पुढे कुठेही वाहतूक कोंडी झाल्यास नुकसान होत असे. त्यामुळे हळूहळू व्यापाऱ्यांनी थेट नारायणगावाकडे मोर्चा वळवला. काही व्यापारी तर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन टोमॅटो खरेदी करायला लागले. व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी सगळा माल उपलब्ध केल्यास लिलाव शक्य होईल या कल्पनेतून नारायणगावमध्ये पंधरा वर्षांपूर्वी उपबाजार समिती स्थापन झाली आणि येथील टॉमेटोचा बाजार अधिक तेजीत आला.

तेव्हापासून ऊन-वारा-पाऊस कोणताही हंगाम असो, दररोज सकाळी आठच्या सुमारास बाजार समितीच्या पटांगणात वेगवेगळ्या दिशेने हिरवे, अर्धे पिकलेले, लालचुटूक टोमॅटोचे क्रेट घेऊन टेम्पो यायला सुरुवात होते. साडेआठ-नऊच्या सुमारास व्यापारी मैदानात उतरतात आणि बोली लावतात. प्रत्येक टेम्पोजवळ जाऊन शेतकऱ्यांकडील टोमॅटोच्या गुणवत्तेनुसार दर ठरतो आणि टेम्पो थेट व्यापाऱ्यांच्या गाळ्यामध्ये जातो.

बीड, जालना, परभणीचे टोमॅटो

अलीकडे बीड, जालना, परभणी भागातही टोमॅटोची शेती केली जाते. पण टोमॅटोला चांगला भाव मिळविण्यासाठी शेतकरी टॉमेटो घेऊन नारायणगाव गाठतात. या बाजारपेठेत दररोज देशभरातून दीडशेहून अधिक व्यापारी येतात. देशभरातील अनेक मोठ्या मॉल्स, हॉटेल चेनला नारायणगावातून टोमॅटो जातो. बाजारसमिती शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील दुवा म्हणून काम करते.

टॉमेटोचा पाचशे वर्षांचा इतिहास

– टोमॅटो ही मूळची वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील. माणसाला साधारण १५५४ च्या सुमारास टोमॅटोची ओळख झाली.

– स्पॅनिश वसाहतवाद्यांनी सोळाव्या शतकाच्या मध्यास ही वनस्पती मेक्सिकोतून युरोपमध्ये आणली. पुढे ब्रिटन, स्पेन आणि इटलीमध्ये टॉमॅटोची लागवड सुरू झाली.

– गेल्या दीडशे वर्षात टोमॅटोला जगन्मान्यता मिळाली आहे.

– भारतात टोमॅटोची लागवड एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली.

– पूर्वी टोमॅटोला बेलवांगे किंवा ब्रिटिशांच्या काळात तांबटे या नावाने ओळखले जात असे.

– आज जगभरात टोमॅटोचे सुमारे साडेसात हजार वाण पिकवली जातात.

राज्यात इतरत्र लहान मोठ्या बाजारपेठा असल्या तरी टोमॅटो ही नारायणगावची खासियत आहे. यासाठी शेतकरी खूप मेहनत घेतात. या पिकाने शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवले. तरुण पिढी टोमॅटो शेतीमध्ये रस घेते आहे. शेतीत प्रयोग करून वेगवेगळ्या जातीचे उत्तम प्रतीच्या उत्पादनांनावर त्यांचा भर आहे.

– शरद घोंगडे,

नारायणगाव उपबाजार समिती

वीस वर्षांपासून मी या बाजारपेठेशी जोडलेलो आहे. शेतकऱ्यांशी आमचा रोजचा संवाद असतो. मागणी आणि उत्पादनाचा आढावा घेऊन दर निश्चित केले जातात. येथील माल आम्ही मुंबई, राजस्थान, गुजरात, ओडिशाला पाठतो. येथील विराण, आर्यमान, साहू, अभिनव अशा विविध जातींच्या टोमॅटोंना मोठी मागणी आहे.

– सखाराम पारधी, व्यापारी

टोमॅटोसाठी पोषक वातावरणामुळे आमच्याकडे उत्तम गुणवत्तेचे टोमॅटो पिकतात. उन्हाळ्यात एरवी सगळीकडे रखरखीत वातावरण असले, तरी या भागात मुबलक पाण्यामुळे टोमॅटोचे पीक घेता येते. त्यामुळे जून-जुलैमध्ये इतरत्र कुठेही टोमॅटोचे पीक होत नसताना नारायणगावातील टोमॅटोला जास्त मागणी असते. हंगामात बाजारभाव वधारल्यास शेतकऱ्यांच्या मेहनतीचे सोने होते. भाव घसरल्यास रस्त्यावर माल फेकून देण्याची वेळ येते. अलीकडील काही वर्षांत व्हायरसचे वाढलेले प्रमाण, हवामानातील तीव्र बदलांचा फटका येथील टोमॅटो शेतीलाही बसतो आहे.

– मयूर कोल्हे, टोमॅटो उत्पादक शेतकरी

बंडानंतर अजित पवारांच्या साथीला; आता शरद पवारांचा फोटो WhatsApp डीपीला; आमदार फिरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here