केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील रस्ते सुरक्षा सप्ताहाची बैठक नुकतीच दिल्ली येथे पार पाडली. आधुनिक यंत्रणा वापरून रस्ते अपघात कमी करण्यासह उपलब्ध उपायांचा आढावा बैठकीत घेण्यात आला होता. गाडी चालवताना थकवा आल्याने तसेच आळसामुळे डुलकी किंवा तंद्री लागल्यास चालकांना तातडीने जागे करून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यासाठी सॉफ्टवेअर आधारित यंत्रणा गाडीत बसविणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा विकसित केल्यास अपघात रोखण्यासाठी मदत होऊ शकते. ‘मोटार वाहन कायद्यात याबाबत सुधारणा करून तसा कायदा लागू केल्यास राज्यातील सर्व बसगाड्यांसाठी हे बंधनकारक करण्यात येईल’, असे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी बैठकीत सूचित केले.
यंत्रणेमध्ये समानता आणण्यासाठी तज्ज्ञ संस्थांकडून यंत्रणेचे प्रमाणीकरण करून घ्यावे त्यानंतर बस-ट्रकमध्ये यंत्रणा बंधनकारक करावी. नियमांत बदल करून कायदा बनवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. सुरक्षा यंत्रणा नसल्यास बसचालक आणि मालकांवर कारवाई करण्याची तरतूद देखील कायद्यात करावी, अशी चर्चा देखील बैठकीत पार पडली. ‘रस्ते सुरक्षेसाठी आधुनिक यंत्रणेचा वापर करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे’, असे आयुक्त भीमनवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बुलढाणा बस अपघातानंतर राज्यातील आरटीओ विभाग देखील सक्रीय झाला आहे.