मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आल्यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला नक्की संधी मिळेल, अशी स्वप्नं रंगवत असलेल्या शिंदे गटातील आमदारांचे मनसुबे राष्ट्रवादीच्या समावेशामुळे पार धुळीला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटातील आमदारांचा एक गट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याविषयी चर्चा करत असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांच्या भाषणानंतर वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची गुप्त खलबतं, एकनाथ शिंदेंनी आमदारांना सांगितलं…

यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, अजितदादा आणि कंपनीने तिकडे उडी मारली त्याच दिवशी शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरीच्या हालचाली सुरु केल्या. आमदारांचा हा उद्रेक थांबवताना एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक आमदार म्हणत आहेत, आम्ही ज्या घरात होतो, तिथेच बरं आहोत. मातोश्रीने आम्हाला साद घातली तर आम्ही नक्की त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं वक्तव्य एका मंत्र्याने केले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथून निरोप येत आहेत. येथील आमदारांमध्ये आपण होतं तिथेच बरं होतं, अशी चर्चा रंगली आहे. मातोश्रीची क्षमा मागून परत जावे का, याबद्दल संबंधित आमदारांमध्ये विचारविनिमय सुरु असल्याची माहिती आम्हाला समजल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

सत्तेत येता राष्ट्रवादी, शिंदेसेनेत वादावादी; २ आमदार भिडले, सीएम दौरा सोडून मुंबईत परतले

शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये बाचाबाची?

सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाल्यापासून शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून त्याचा उद्रेक मंगळवारी रात्री पाहायला मिळाला. याच मुद्दय़ावरून दोन आमदारांत मंगळवारी सायंकाळी बाचाबाची आणि झटापट झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नव्या सत्ता समीकरणांनुसार शिंदे गटाच्या वाटय़ाला आणखी जेमतेम तीन ते चार मंत्रिपदे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यात आपली वर्णी लागावी यासाठी शिंदे गटातील आमदारांतच चुरस निर्माण झाली आहे. काही आमदारांनी ‘गेले वर्षभर ज्यांना मंत्रिपद उपभोगता आले, त्यांना हटवून इतरांना संधी द्या’ अशी जाहीर मागणी केली आहे.

मंत्रिपदावर दावा करणाऱ्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका टोकाला गेला की उभयंतांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याची माहिती आहे. आमदारांमधील भांडणाचे वृत्त समजताच नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत परतावे लागले. त्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यानंतर बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर आमदार आणि खासदारांची एक बैठकही पार पडली. या बैठकीनंतर शिंदे गटाच्या आमदारांकडून सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याची जोरदार चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here