म.टा. प्रतिनिधी, नगर

करोनामुळे यावर्षी तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश आहे. मात्र, पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा परिसर सध्या गजबजून गेला आहे. सामान्यांना ई-पास मिळणे दुरापास्त असताना विविध स्टीकर लावलेली वाहने घेऊन सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या या पर्यटकांमुळे परिसरातील ग्रामस्थांना धडकी भरली आहे. करोनाचा प्रादूर्भाव जास्त असलेल्या शहरांतून हे पर्यटक येत असल्याने भिती वाढली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. नगरसह, मुंबई, पुणे, नाशिक भागातील हे पर्यटक आहेत. त्यातील अनेकांच्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा, महाराष्ट्र शासन, पोलिस, भारत सरकार, प्रेस, व्हीआयपी अशी विविध प्रकारची स्टीकर्स लावलेली असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ करोना काळात सेवा देता यावी, यासाठी देण्यात आलेल्या सवलतीचा गैरफायदा अगर बनावट वापर करून ही मंडळी मौजमजा करण्यासाठी भंडारदरा परिसरात आल्याचे दिसून येते.

शनिवारी आणि रविवारी अशी शेकडो वाहने या परिसरात आली होती. त्यातून आलेले पर्यटक, रस्त्यावर, दऱ्याखोऱ्यांत, झऱ्यांजवळ फिरताना दिसत होते. काहींनी तर मद्यपान करून गोंधळ घातल्याचीही ग्रामस्थांची तक्रार आहे. मुख्य म्हणजे चालून आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी बंदी असूनही परिसरातील काहींनी आपली हॉटेल्स उघडून या पर्यटकांना सेवा पुरविल्याचेही सांगण्यात येते. यामुळे करोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका असल्याकडे सरपंच पांडुरंग खाडे यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी यासंबंधी रितसर तक्रारच प्रशासनाकडे केली आहे. येथे येणारे पर्यटक पोलिस किंवा सरकारी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक आहेत काय, त्यांना ही सवलत कोणी दिली, कारवाई का केली जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे. करोना संसर्ग नियंत्रण समितीचे सरपंच अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांच्या भागाची जबाबदारी कायद्यानुसार त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, तर या समितीचा राजीनामा देण्याचा इशाराही खाडे यांनी दिला आहे.

काही ठिकाणी पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही पर्यटकांनी त्यांनाच दमबाजी केल्याचे सांगण्यात आले. काहींनी वरिष्ठांशी संपर्क करून देत आपली वाट मोकळी करून घेतली. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पोलिस आणि वनविभागाचे अधिकारीही यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचे सांगण्यात आले.

करोना अटोक्यात येत नसल्याचे पाहून यावर्षी भंडारदरा परिसरातील पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय परिसरातील गावांनी घेतला होता. शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे यांनी यासंबंधी गेल्या महिन्यातच पर्यटकांना येथे न येण्याचे आवाहनही केले होते. या भागातील पर्यटन हेच उपजिविकेचे मुख्य साधन आहे. हॉटेल्ससह इतर छोट्या मोठ्या व्यवसायांवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. तरीही संसर्ग टाळण्यासाठी हे नुकसान सहन करून पर्यटन बंद ठेवण्याचे ठरविले आहे. मात्र, या अनाहुत पर्यटकांमुळे शेवटी तो धोका आलाच, अशी खंत व्यक्त होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here