मेलबर्न: ऑस्ट्रेलियामध्ये २०२१ साली २१ वर्षांच्या भारतीय विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तरुणीच्या माजी प्रियकरानं तिला तारांनी बांधून जिवंत गाडलं होतं. तरुणीनं लग्नासाठी दिलेला नकार तिच्या मृत्यूला कारण ठरला.विद्यार्थिनी असलेल्या जस्मीन कौरचं अपहरण तिचा माजी प्रियकर असलेल्या तारिकजोत सिंगनं केलं. उत्तर प्लायम्टन भागात तारिकजोतनं तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिचं अपहरण करुन तिला फ्लिंडर्स रेंज परिसरात घेऊन गेला. तिथे तिचा अनन्वित छळ करण्यात आला. यानंतर तिला एका कबरीमध्ये दफन केलं. ५ मार्च २०२१ रोजी ही घटना घडली. तारिकजोतनं यावर्षीच्या फेब्रुवारीत गुन्ह्याची कबुली दिली. तारिकजोतचं जस्मीनवर प्रेम होतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. तारिकजोतनं त्याला नकार दिला. मात्र शंभरावेळा नकार दिल्यानंतरही तो ऐकायला तयार नव्हता. ‘मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या जस्मीनचा तारिकजोतनं अनन्वित छळ केला. त्यानं तिला चिकटपट्टी आणि तारांनी बांधलं. त्यानं तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर तिला एका कबरीमध्ये जिवंत पुरलं. जस्मीनच्या गळ्यावर जखमा होत्या. मात्र त्या तिच्या मृत्यूच्या कारण नव्हत्या. तिचा मृत्यू ६ मार्च २०२१ रोजी झाला,’ अशी माहिती तिच्या कुटुंबियांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. तारिकजोतनं बदला घेण्याच्या भावनेनं जस्मीनला अतिशय निर्घृणपणे संपवलं, असं तिच्या वकिलांकडून न्यायालयाला सांगण्यात आलं. हत्येचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यात हत्येच्या काही तास आधी तारिकजोत एका हार्डवेअर दुकानातून तार, फावडं आणि हातमोजे खरेदी करताना दिसला. जस्मीननं दिलेला नकार पचवू न शकल्यानं त्यानं तिच्या हत्येची योजना आखली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here