म. टा. प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबईतील उरण लोकल आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकातून प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. देशातील तिसऱ्या क्रमाकांचा रखडलेला रेल्वेप्रकल्प अशी चर्चा असलेला मध्य रेल्वेचा ‘बेलापूर-खारकोपर-उरण’ मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानकाचा प्रवासीवापर येत्या १० दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी शनिवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.

काम पूर्ण होऊन काही कारणांमुळे सुरू न झालेल्या रेल्वेप्रकल्पांचा आढावा रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे खारकोपर-उरण रेल्वे मार्गातील नाममात्र अडचणी दूर करून तो प्रवाशांसाठी खुला करण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा पूर्ण झाली असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Monsoon 2023 : राज्यात पुढचे दोन दिवस कुठं हलका तर कुठं मुसळधार पाऊस बरसरणार, IMD चा अंदाज जाहीर
केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प निरीक्षण विभागाने राज्यातील सर्वाधिक विलंबित रेल्वे प्रकल्प म्हणून बेलापूर-खारकोपर-उरण मार्ग असल्याचे जाहीर केले आहे. मार्च १९९७मध्ये या प्रकल्पासाठी ४९५ कोटींचा प्रारंभिक खर्च अपेक्षित होता. मार्च २००४ मध्ये प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, विविध कारणांमुळे रखडलेल्या या प्रकल्पाचा खर्च सध्या एक हजार ७८२ कोटींवर पोहोचला आहे.

दीर्घकाळ रखडलेला हा प्रकल्प ‘बेलापूर-खारकोपर’ आणि ‘खारकोपर-उरण’ अशा दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. नोव्हेंबर २०१८मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचा पहिला बेलापूर-खारकोपर सुरू करून लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या. बेलापूर-खारकोपर-उरण दुहेरी रेल्वे मार्गिकेची लांबी २६.७ किमी आहे. बेलापूर/नेरूळ ते खारकोपर पहिला टप्पा १२.४ किमीचा आहे. खारकोपर ते उरण दुसरा टप्पा १४.३ किमीचा आहे. बेलापूर/नेरूळ-खारकोपरदरम्यान सध्या एकूण ४० फेऱ्या चालवण्यात येत आहेत.

सर्व लोकल दिघा स्थानकांत थांबणार!

दिघा स्थानक खुले झाल्यानंतर ट्रान्सहार्बर मार्गावरील सर्व लोकल या स्थानकांत थांबणार आहेत. एमयूटीपी-३मधील नवीन कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचा पहिला टप्पा दिघा स्थानक आहे. कळवा स्थानक परिसरातील सुमारे ७०० प्रकल्पबाधितांनी पर्यायी जागेस जाण्यास नकार दिल्याने कळवा-ऐरोली उन्नत मार्ग रखडला आहे.

बसच्या तुलनेत स्वस्त प्रवास

‘बेलापूर-खारकोपर-उरण’ या दुसऱ्या टप्यात गव्हाण, जसई, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी ही स्थानके आहेत. नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून नागरीकरणही वेगाने सुरू आहे. लोकलची जोडणी झाल्यानंतर बसच्या तुलनेत स्वस्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून, उरण लोकल सुरू होणार आहे. उरण हे ओएनजीसी, जेएनपीटी बंदर, भारत पेट्रोलियम, वायू विद्युत केंद्र व बंदरावर आधारित उद्योग यांमुळे राज्यातील मुख्य औद्योगिक केंद्र बनले आहे. यामुळे केंद्रातील कामगारांना लोकल प्रवासाचा मोठा फायदा होणार आहे.

प्रकल्पाचा तपशील

– बेलापूर-खारकोपर-उरण : २६.७ किमी (दुहेरी मार्गिका)

– नेरूळ/बेलापूर ते खारकोपर येथून प्रथम टप्पा : १२.४ किमी

– सद्यस्थिती : रोज ४० फेऱ्या, ३० ते ४० हजार प्रवासी

– खारकोपर ते उरणपर्यंतचा दुसरा टप्पा: १४.३ किमी

– सद्यस्थिती : उद्घाटनाची प्रतीक्षा

– प्रकल्पाची एकूण किंमत : १,७८२ कोटी रुपये

गुड न्यूज, दमदार पावसाचा इफेक्ट, मुंबईकरांचा पुढच्या दोन महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here