मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे ‘टॉनिक’ होते. ते टॉनिक संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी भाजपची सूज आता उतरली आहे. जिल्हा परिषदांचा कौल अगदी स्पष्टच आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले आहे, अशी टोलेबाजी करतानाच भाजप आता काय करणार?, असा खोचक सवाल शिवसेनेने केला आहे.

जिल्हा परिषद निवडणूक निकालांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभव पाहावा लागला आहे. सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. यात धुळे वगळता अन्य पाच जिल्हा परिषदांत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. यावर बोट ठेवत शिवसेनेचे प्रवक्ते व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखातून भाजपवर फटकारे मारले आहेत.

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय…

> जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची पीछेहाट झाली आहे. एकमेव धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील ‘मेकअप’ उतरला आहे. सत्तेमुळे आलेली ही लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बऱ्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी सहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या निकालांनी फुंकली आहे. नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशीम, पालघर, अकोला अशा सहा जिल्ह्यांत निवडणुका झाल्या. त्यात धुळ्यात भाजपची निर्विवाद सत्ता आली. येथे शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या गेल्या असत्या तर भाजप येथेही गटांगळ्या खाताना दिसला असता.

> सगळ्यात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपचा दारुण पराभव फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी तेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या ‘बकवास’ थापेबाजीला कंटाळली आहे.

> नंदुरबारमध्येही काँग्रेसने थोडे हुशारीने घेतले असते व शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर गेले असते तर जिल्हा परिषदेतून भाजपचे नामोनिशाण मिटले असते. नंदुरबारची सत्ता भाजपने गमावली आहे. त्याचे नैराश्य इतके की, अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेली. मुळात नंदुरबारसारख्या जिल्ह्यात भाजपचे स्वतःचे असे काही स्थान नाही. राष्ट्रवादीतले विजयकुमार गावीत व इतर ‘उपरे’ घेऊन त्यांनी जी उधार-उसनवारी केली त्यामुळे तेथे भाजपचे झेंडे लागले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here