पवारांनी साताऱ्यातील जनतेची माफी मागितलेली

२०१४ ला मोदी लाट आली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीतून आऊटगोईंग वाढली. लोकसभेतील राष्ट्रवादीचे अनेक पराभूत उमेदवार विधानसभेवेळी भाजपमध्ये सामील झाले. सातारा लोकसभेतून विजयी झालेले खासदार उदयनराजे भाजपमध्ये गेल्याने पोटनिवडणुक झाली. उदयनराजेंविरोधात प्रचार करत असताना पवारांनी साताऱ्यातील जनतेची माफी मागितली. पवारांच्या भावनिक आवाहनाचा परिणाम निकालाता दिसला, परिणामी उदयनराजे पराभूत झाले.
साताऱ्यात पवारांनी भर पावसात जनतेची माफी मागितलेली

साताऱ्यात पवारांनी भर पावसात भिजत जनतेची माफी मागितली आणि मतदारांनी मनावर घेऊन उदयनराजेंना घरी बसवलं. आताही पवारांनी पुन्हा तोच पॅटर्न राबवला. भुजबळांनी साथ सोडूनही पवारांच्या सभेला येवलेकरांचा प्रतिसाद होता. टीका करायला नाही, तर माफी मागायला आल्याचं सांगून पवारांनी सभा जिंकली. भुजबळांनी साथ सोडल्याने माझा अंदाज चुकल्याचं पवार येवल्यातील सभेत म्हणाले. पवारांकडून माफी मागत भुजबळांची ताकद वाढवणाऱ्या मतदारांमध्ये साद घातली. पवारांच्या सहानुभूतीच्या भाषणाने भुजबळांचं टेन्शन वाढलं आहे.
पवारांच्या माफीनंतर भुजबळांचा आक्रमक पवित्रा

येवल्यात येऊन पवारांनी मतदारांची माफी मागताच छगन भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतला. कारण साताऱ्यात पवारांच्या माफी मागण्याच्या विधानामुळे उदयनराजेंचा कार्यक्रम झाल्याचा इतिहास फार जुना नाही. छगन भुजबळांसारख्या विश्वासू नेत्याने साथ सोडल्याने शरद पवारांना धक्का बसला. त्यामुळे भुजबळांच्या बंदोबस्तासाठी पवार स्वतः मैदानात उतरले. साताऱ्याची पुनरावृत्ती येवल्यात करण्याचा मनसुबा शरद पवारांचा दिसतो. मात्र, छगन भुजबळही पवारांच्याच तालमीतले नेते असल्याने सहानुभूतीच्या पातळीवर भुजबळ काय उपाय करतील, हे पाहावं लागेल.
येवला मतदारसंघ छगन भुजबळांना कसा दिला?

शरद पवारांनी छगन भुजबळांना येवला मतदारसंघ कसा दिला याबाबतचा इतिहास सांगितला. छगन भुजबळ यांनी त्यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर नाशिकमध्ये येथील लोकांशी चर्चा केल्यानंतर भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढवावी असं सुचवलं गेलं होतं, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी सांगितला येवला आणि भुजबळांचा इतिहास

तसंच १९८० मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडलो असल्याचं पवारांनी सांगितलं. येवला आमच्या विचारांचा तालुका असल्याचंही ते म्हणाले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पुढे कॉंग्रेस (एस) पक्ष स्थापन केला गेला आणि नाशिकमधील जनतेने सर्वच्या सर्व जागा आम्हाला निवडून दिल्याची आठवण पवारांनी सांगितली. सलग दोन वेळा जर्नादन पाटील निवडून आले होते. त्यामुळे भुजबळांना सुरक्षित जागा द्यायची होती म्हणून त्या मतदारसंघातील लोकांची परवानगी घेतली आणि यश आल्याचं ते म्हणाले.