याआधी सर्व विरोधी पक्षांनी गेल्या महिन्यात पाटण्यात बैठक घेतली होती. तेव्हा १५ पक्षांचे ३२ नेते उपस्थित होते. आता बेंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत २४ ते २५ पक्ष सहभागी होणार आहेत. दिल्लीच्या अध्यादेशावरून काँग्रेससमोर अटी ठेवणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीगलाही काँग्रेसने या बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. या बैठकीपूर्वी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांना रात्रीच्या स्नेहभोजनासाठी आमंत्रित करणे, सर्व विरोधी पक्षांना बैठकीचे निमंत्रण देणे, या घटनेकडे विरोधी पक्षांची एकजूट आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
दुसऱ्या बैठकीत आठ नवे पक्षही सहभागी होतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार बेंगळुरूतील बैठकीत सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार असल्याने बेंगळुरूतील बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
तीन कार्यगट:
विरोधी आघाडीचे संयोजक म्हणून नितीशकुमार यांचे नाव आघाडीवर आहे. बेंगळुरूच्या बैठकीत किमान तीन कार्यगट तयार करण्यावर विरोधकांचा भर राहील. पहिल्या गटाकडे भाजपविरुद्ध एक किमान समान कार्यक्रम तयार करणे आणि समान मुद्दे शोधणे ही जबाबदारी राहील. दुसरा कार्यगट राज्यांमधील आघाड्यांची ढोबळ रूपरेषा तयार करेल. प्रादेशिक पक्षांसोबतची ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच आहे का हेही ठरवले जाईल. भाजपच्या विरोधात विरोधकांचा एकच उमेदवार कसा उभा करायचा हा मुद्दाही मुख्य चर्चेचा असेल. तिसरा कार्यगट पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑगस्टपासून विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त सभांच्या तारखांवर काम करेल.