नगर : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सध्या सुरू असलेला वाद तत्कालीन पंतप्रधान यांच्या काळातही एकदा उपस्थित झाला होता. त्यावेळी नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. मात्र, याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली होती. पक्षांतर्गत विरोध वाढल्याने त्यांना पक्ष सोडावा लागून तब्बल १४ वर्षे पक्षापासून दूर रहावे लागले होते. आताही सामूहिक नेतृत्वाचा विचार मांडणाऱ्या नेत्यांना पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

विखे पाटील इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. पक्षाच्या वरिष्ठ वतुर्ळातही त्यांचे वजन होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा राजीव गांधी यांच्याकडे आली. मधल्या काळात काँग्रेसला कठीण दिवस आले होते. त्यावेळीही आजच्या सारख्याच नेतृत्व बदालाच्या चर्चा सुरू झाल्या. तेव्हा विखे यांनी पुढाकार घेत ॲक्शन फोरम स्थापन करण्याचा विचार मांडला. या फोरमच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेऊन पक्ष विस्ताराची यंत्रणा उभारण्याची त्यांची योजना होती. विखे यांच्या महत्वाकांशी स्वभावाची माहिती असलेल्या काँग्रेसमधील नेत्यांनी याबद्दल वेगळाच संशय घेतला. विखे स्वत:ची यंत्रणा आणि वजन वाढविण्याचा या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याचा सूर उमटला. राजीव गांधी यांच्याकडेही हा मुद्दा वेगळ्या स्वरुपात मांडण्यात आला. त्यामुळे विखेंना त्यांचीही नाराजी पत्कारावी लागली आणि शेवटी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीच्या या घडमोडी आहेत. त्यामुळे राजीव गांधीचे काम भरणाऱ्यांमध्ये त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केलेल्या काही नेत्यांचाही सहभाग होता.

काँग्रेस सोडल्यानंतर विखेंनी लगेचच कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. जिल्हा विकास आघाडी स्थापन करून त्यामार्फत काम सुरू केले. १९९१ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यावेळी काँग्रेसने त्यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत गडाख जिंकले खरे मात्र प्रकरण कोर्टात जाऊन तेथे विखे जिंकले. काँग्रेसपासून दुरावलेल्या विखेंनी १९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभेची निवडणूक लढवून केंद्रात मंत्रिपदही मिळविले. त्यांचे पुत्र राधाकृष्ण यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. ते आमदार म्हणून निवडून आले. राज्यात तत्कालीन युती सरकारमध्ये मंत्रीही झाले. काँग्रेसकडून तब्बल सहा वेळा विजयी झाल्यावरही विखे यांना केंद्रात पद मिळाले नव्हते, ते शिवसेनेच्या काळात मिळाले. १९९९ मध्ये ते पुन्हा तत्कालीन कोपरगाव मतसंघातून खासदार झाले. मधल्या काळात बरेच राजकीय बदल झाले. २००४ मध्ये विखे पिता-पुत्रांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब विखे पुन्हा काँग्रेसचे खासदार झाले. तर राधाकृष्ण राज्यातील आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले. नंतर मतदारसंघ राखीव झाल्याने बाळासाहेब विखे यांना निवडणूक लढविता आली नाही. आयुष्याच्या सायंकाळी काँग्रेसमध्येच राहणार असे सांगत ते अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहिले, मात्र अधून मधून पक्षातील व्यवस्थेसंबंधी मत प्रदर्शन करीतच राहिले. आता त्यांचा मुलगा आणि नातूही भाजपमध्ये आहेत. नातू डॉ. सुजय विखे यांनीही काँग्रेसला झटका देत ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये सामुहिक नेतृत्वाबद्दल सध्या जी चर्चा सुरू आहे, तिच आमच्या आजोबांनीही त्यावेळी केली होती. इतक्या वर्षांत काँग्रेसने यातून धडा घेतलेला दिसत नाही. अर्थात आता आपण वेगळ्या पक्षात आहोत, त्यामुळे त्यांचे त्यांनी पहावे आणि ठरवावे.

– डॉ. सुजय विखे पाटील, खासदार, नगर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here