म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड : प्रेयसीसोबत संगनमत करून अनैतिक संबधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने दोरीने गळा आवळून खून केला व मृतदेह अजिंठा घाटात नेऊन फेकला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात मृत तरुणाची बेपत्ता असल्याची नोंद होती. पोलिस तपास करीत असताना वरील माहिती समोर आली आणि गुरुवारी आरोपींना पोलिसांनी सिल्लोड तालुक्यातील पळशी येथून ताब्यात घेतले.राजू बाबूलाल महेर (वय ३२, रा. पळशी) असे मृत तरुणाचे आहे. गणेश महेताप महेर (वय ३२), रेणुका राजू महेर (वय ३०, दोघे रा. पळशी) गजानन कोंडिबा भोंबे, करण नारायण बारवाल दोघे (रा. आडगाव भोंबे, ता. भोकरदन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी गणेश व करण बारवाल या दोघांना अटक केली आहे.राजू महेरची पत्नी आरोपी रेणुका व गणेश महेर यांच्यात अनैतिक संबध होते. याची माहिती राजूला समजल्याने पती आणि पत्नीत भांडण होत होते. राजू दोघांच्या अनैतिक संबधात अडसर ठरत असल्याने दोघा आरोपींनी त्याचा कायमाचा काटा काढायचे ठरवले. ही बाब आरोपीने गणेशने गजानन भोंबेला सांगितली. ४ जूनला सकाळी गणेश राजूला दुचाकीवरून सिल्लोडला घेऊन आला. यानंतर दारू पिऊन तिघे रात्री शहरातील शिक्षक कॉलनीतील पवननगर येथील गणेशचे दाजी नारायण बारवाल यांच्या घरी गेले. तेथे आरोपींनी राजूचा दोरीने गळा आवळून खून केला व मृतदेह करण बारवालच्या क्रूझर जीपने अजिंठा घाटात नेऊन फेकला.आरोपीला घेऊन पोलिसांनी अजिंठा घाट गाठला असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता व प्रचंड दुर्गंध वास येत होता. यामुळे पोलिसांनी जागेवरच शवविच्छेदन करुण घेतले. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी रविकिरण भारती यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुण वरील आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे करीत आहेत.
Home Maharashtra लग्नानंतर महिलेचा दुसऱ्या तरुणावर जडला जीव; पतीला खबर लागताच प्रियकराच्या मदतीने भयंकर...