राजेवाडी (जि. रायगड) ते वरंधमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ मंजूर आहे. त्यामध्ये शिंदेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) ते महाडपर्यंतचा ८१.१६ किलोमीटरचा रस्ता दुपदरी होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान ८२३.१३ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये काँक्रिटीकरण, घाटातील डांबरीकरण, संरक्षक भिंती, सुरक्षा योजना यांचा समावेश आहे. कामासाठी निविदा आल्या आहे. मात्र, पुढील प्रक्रिया अद्याप सुरू नाही.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी २२ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी जारी केला. मात्र, या काळात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा न मिळाल्यास हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहू शकते, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाळी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत पावसाळ्यात वरंध घाटात दरडी कोसळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उपायोयजना करण्यासंदर्भात भोर पोलिस ठाणे आणि तहसीलदारांनी घाट रस्ता बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी घाटातील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
हवामान विभागाने २२ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीबाबत रेड किंवा ऑरेंज अलर्ट दिल्यास अवजड वाहनांबरोबरच मध्यम व हलक्या वाहनांसाठी वाहतुकीसाठी वरंध घाट बंद असेल. मात्र, या काळात अलर्ट नसल्यास घाट फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.