तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले होते. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला असून त्याचे कुटुंबीय मात्र सुदैवी ठरले नाहीत. या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या दुर्घटनेचे वृत्त समजताचशिंदे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेग दिला होता. ठाणे महापालिकेची २ आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दलाची तुकडीही शिंदे यांच्या आदेशानुसार मदतकार्यात व्यग्र आहे. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्त्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
महाडच्या काजळपुरा परिसरात सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० लोक दबले होते. या घटनेनंतर स्थानिक लोक, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. या इमारतीत एकूण ४१ कुटुंब राहत होते. त्यापैकी १८ कुटुंबांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times