मुंबई : पालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये लसीच्या चाचण्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची चर्चा आहे. मात्र पुण्यात सुरू झालेल्या चाचण्यांमधील शंभर स्वयंसेवकांवर या लसीचा परिणाम काय होतो या वैद्यकीय निष्कर्षांचा अभ्यास झाल्यानंतरच मुंबईमध्ये लसचाचण्या करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. चाचण्यांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नैतिक समितीकडून चाचण्यांमधील काही बाबींसाठी मिळणारी संमतीसह प्रत्यक्ष ज्यांना लस देण्यात आली आहे त्यांच्यामधील लशीची परिणामकारकता तपासल्यानंतर मुंबईतील पुढील वैद्यकीय प्रक्रियेला गती येणार आहे.

मुंबईमध्ये लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटिव्ह असलेल्या करोनारुग्णांचे प्रमाण अधिक आहे. तपासण्या न झाल्यामुळे छुप्या पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींचे प्रमाण अधिक असू शकते. मुंबईमध्ये लशीच्या चाचण्यांसाठी व्यक्तींची निवड करताना हेदेखील मोठे आव्हान असणार आहे. करोना नसलेल्या व्यक्तींना लस दिल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकते यादृष्टीनेही अभ्यास करण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडींचा प्रभाव हा किती महिन्यांसाठी राहतो हादेखील या संशोधनामधील एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. मुख्य औषधांचा समावेश नसलेल्या दुसऱ्या गटालाही प्लेसिगो पद्धतीने डोस दिला जाणार आहे. या गटातील व्यक्तींमध्येही काही दिवसांनी औषध न देताही अँटीबॉडी तयार झाल्या तर त्यावरून लशीची परिणामकारता नसल्याचा निष्कर्षही निघू शकतो. ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांचा मानसशास्त्रीय अंगानेही अभ्यास केला जाईल तसेच व्यक्तीनिहाय संप्रेरकांमधील प्रभाव तपासून पाहण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here