रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उंच कड्याखाली भीमाशंकरजवळ पदरवाडी ही छोटी वाडी आहे. या वाडीत १५ आदिवासी कुंटुबे राहतात. ८०च्या आसपास लोकसंख्या आहे. या वस्तीपासून १०० मीटरवर डोंगर आहे. या डोंगरावर एक ऑगस्ट रोजी सुमारे ३०० मीटर लांब भेग पडल्याचे समोर आले. स्थानिक ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिली. खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी याची दखल घेऊन तात्काळ घटनास्थळाची पाहणी करण्याचे निर्देश खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना दिले. यानंतर बेडसे यांनी विविध सरकारी विभागांतील कर्मचाऱ्यांची पथके तयार केली.
यामध्ये अपर तहसीलदार तथा परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी डॉ. नेहा शिंदे यांच्यासह वन विभाग, पोलीस यत्रंणा, तलाठी आणि ग्रामसेवकांचा समावेश आहे. त्यांनी नुकतीच भीमाशंकर अभयारण्यातून चार तास पायी प्रवास करून पदरवाडीला भेट दिली आणि स्थानिकांशी संवाद साधला. पथकाने परिसराची पाहणी केली आणि डोंगरभागात सतत संततधार पाऊस असल्याने हा भाग खचण्याची शक्यता व्यक्त केली.
तात्पुरते स्थलांतर करण्याच्या हालचाली
ईशाळवाडीची दुर्घटना ताजी आहे. यामुळे पदरवाडीला भूस्खलनाचा धोका असल्यास येथील आदिवासी कुटुंबाचे तातडीने स्थलांतर करण्याची गरज आहे. डोंगरावर भेग पडल्याने भीतीचे वातावरण असल्याचे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सध्या पावसाळ्यात तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
पर्यटनातून रोजगार
कोकणातून भीमाशंकरला अनेक भाविक, पर्यटक ट्रेक करीत पायी येतात. या मार्गावरच पदरवाडी येते. येथील आदिवासी नागरिकांना पर्यटकांकडून काही प्रमाणात रोजगार मिळतो. यांसह पारंपरिक भातशेती व पाळीव जनावरांपासून मिळणारे उत्पन्न यावर येथील कुटुंबांचा चरितार्थ चालत आहे.