विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने आणलेल्या ‘अविश्वास प्रस्तावा’ला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २ तास १३ मिनिटांचं लांबलचक भाषण केलं. ज्या मुद्द्यांवरून विरोधकांनी अविश्वास ठराव आणला, त्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी अगदी चार-पाच मिनिटेच बोलले. मोदींच्या याच भाषणाचा समाचार राहुल गांधी यांनी राजधानी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूर जाळायचे आहे. त्यांना तिथली आग विझवायची नाहीये. त्यामुळेच मी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाल्याचे म्हटले होते. मी हे विधान उथळपणे केलेलं नव्हते. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आगीचा वणवा पेटलाय, लोक मारले जातायेत, महिलांवर बलात्कार होतायेत, लहान मुलांना मारले जातंय आणि आपले पंतप्रधान संसदेत हसून भाषण करतायेत. गंभीर विषयावर बोलत असताना हसत हसत, विनोद करत, विरोधकांची खिल्ली उडवत भाषण करणं भारताच्या पंतप्रधानांना हे वागणं शोभत नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली.
मी जवळपास १९ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत प्रत्येक राज्यात गेलो आहे. १९ वर्षात मी मणिपूरमध्ये जे काही पाहिलं आणि ऐकलं ते याआधी कधीच पाहिलं नाही. जेव्हा आम्ही मैतेई भागात गेलो तेव्हा आम्हाला सांगितले होते की आमच्या सुरक्षेसाठी कुकी वैयक्तिक आणू नका, अन्यथा आम्ही त्यांना मारून टाकू. जेव्हा आम्ही कुकी भागात गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की मैतेईला आमच्या सुरक्षेसाठी आणू नका नाहीतर आम्ही त्याला गोळ्या घालू. आम्हाला दोन्ही ठिकाणी मैतेई आणि कुकी यांना वेगळं करावं लागलं. म्हणूनच मी म्हणालो की भारतमातेची हत्या झालीये, असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या विधानावर दिलं.