सध्या पावसाच्या तुरळक सरींची हजेरी लागते आहे. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ही स्थिती कायम राहील. १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी मात्र चांगल्या पावसाची शक्यता आहे. यादिवशी जोरदार पावसाचा अंदाज नसला तरी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसू शकतात.
प्रादेशिक हवामान खात्यानुसार, १७ ते २३ ऑगस्ट या काळात चांगल्या पावसाची शक्यता आहे. या काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाची आशा आहे. सध्या विदर्भातील पर्जन्यमानाची स्थिती चांगली असून चारच टक्क्यांची तूट आहे. यात यवतमाळात सर्वाधिक १६ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. परंतु, अमरावती व अकोला या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे २४ आणि २० टक्के तूट असून, ती चिंताजनक आहे. नागपुरातसुद्धा तीन टक्क्यांची तूट आहे. मात्र, ती चिंताजनक नाही. तसेच अन्य काही जिल्ह्यांधील तूटसुद्धा फारशी चिंताजनक नाही. पुढील आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने ही तूट भरून निघेल असा अंदाज आहे.
मान्सूनच्या ब्रेकनं चिंता वाढली
राज्यात मान्सूनच्या पावसाचं अगोदरच उशिरानं आगमन झालं. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता. तर, जूनमधील कसर जुलै महिन्यातील पावसानं भरुन काढली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पावसानं ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमुळं सर्वांची चिंता वाढलेली आहे. एकीकडे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत झालेला नाही. त्यामुळं शेतीच्या जलसिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे पाऊस सुरु झाला नाही तर पिकं कशी वाचवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं पावसाचं कमबॅक कधी होणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे.