सागरी किनारा रस्ता प्रकल्प तीन टप्प्यांत होत आहे. मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला हा दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक असे तीन टप्पे असून प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. या प्रकल्पात वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधव वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाच्या दोन खांबांमध्ये २०० मीटर लांबीचे अंतर ठेवावे, अशी मागणी करीत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीची शिफारस मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून दोन खांबांमधील अंतर ६० मीटरवरून १२० मीटर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या कामाचा खर्च करांसह ९२२ कोटींनी वाढला आहे. याआधी हाच खर्च ६२१ कोटी रुपये होता. दोन खांबांमधील अंतर वाढल्याने, त्यातच वस्तू आणि सेवा करात १२ टक्क्यांवरून १८ टक्के वाढ झाल्यामुळे प्रकल्पाची मूळ किंमत १२ हजार ७२१ कोटी असताना हीच रक्कम १३ हजार ९०० कोटीहून अधिक रक्कमेपर्यंत पोहोचली आहे. हा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू झाला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून किमान अतिरिक्त वेळ आणि खर्चासह प्रकल्प वेळेत पूर्ण केला जाणार आहे.
मुंबई किनारा रस्ता प्रकल्पामुळे ९६.५१ हेक्टर नवीन जमीन उपलब्ध होणार आहे. त्यापैकी सुमारे ७० हेक्टर जागा हिरवळ, सायकल ट्रॅक, जॉगिंग पार्क इत्यादी सुविधांसाठी उपलब्ध असणार आहे.
वेगवान प्रवास
पहिला टप्प्यात प्रियदर्शनी ते मरीन ड्राईव्हपर्यंत साडे तीन किलोमीटर लांबीचा बोगदाही सेवेत येणार आहे. त्यामुळे एकंदरीतच वरळी सी फेस ते मरीन ड्राइव्ह असा सध्या अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास दहा ते पंधरा मिनिटांत होणार आहे. या बोगद्यातून साधारण तीन चे चार मिनिटांत प्रवास होईल. या बोगद्यातून ६० ते ८० प्रति तास वेगाने वाहने जाऊ शकतील. सध्या या बोगद्यात काँक्रिटीकरणाच्या कामांसह अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात येत आहेत. यामध्ये अग्निरोधक फायर बोर्ड बसवण्यात येत आहेत. पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये पूर्ण केला जाणार आहे.
कृत्रिम खडकाचा प्रयोग
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे भरणी करून ९६.५१ हेक्टर नवीन जमीन उपलब्ध होणार आहे. ८ लाख ८० हजार क्युबीक मीटर म्हणजेच १ लाख ४० हजार ट्रक भरतील एवढा भराव किनारा रस्ता प्रकल्पासाठी टाकण्यात आला आहे. प्रकल्पाला सीआरझेडने (किनारपट्टी नियमन क्षेत्र) मंजुरी देताना जैवविविधता म्हणजे सागरी जीव टिकवण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी प्रयत्न करा, त्यांची पैदास किंवा वाढ होण्यासाठी कृत्रिम खडक (आर्टिफिशियल रीफ) तयार करण्याचे नमूद केले होते. त्यानुसार जैवविविधता टिकवण्यासाठी महापालिकेने ‘कृत्रिम खडका’चा (आर्टिफिशियल रीफ) प्रयोग सुरू केला आहे. यामुळे सागरी जीवांना समुद्रकिनाऱ्यावर निवासस्थान उपलब्ध होणार असून त्यांची वाढ किंवा पैदास होण्यास मदत मिळणार आहे. तसेच मुंबई किनारा रस्ता प्रकल्पात मरीन ड्राइव्ह प्रियदर्शनी ते वरळी सी फेस या पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरच्या टप्प्यात समुद्र किनाऱ्यालगत १३ हजार ३०० नवीन क्राँकिटचे टेट्रापॉड बसवण्यात येणार आहेत.