जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील चंद्रकांत अनिल पाटील या तरुण शेतकऱ्याची ही करुण कहाणी आहे. चंद्रकात लहान असतांना त्याचे वडील वारले, घरात तो एकुलता…१२ वीपर्यंत शिक्षण केलं आणि कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. नोकरी मिळेल की नाही, त्यात वेळ वाया जाणार , एकट्या आईचं घरी कसं होणार यामुळे चंद्रकांत याने नोकरीचा विचार सोडला वडीलोपार्जित दोन बीगे असलेल्या शेती करण्याचा निर्णय घेतला, याच दोन बिगे शेतीवर चंद्रकांत आणि त्याच्या आईचा उदरनिर्वाह भागतो. चंद्रकांत याने गेल्यावेळी कपाशी लावली होती, मात्र तिला भाव मिळाला नाही, आता पुन्हा कर्ज काढलं, यंदातरी भाव मिळेल म्हणून संपूर्ण शेतात कपाशीचीच लागवड केली. लाखभर उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती, या अपेक्षेवर पावसाने पाणी फेरले. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात उगवलेली कपाशी खराब झाली. आणि तिला उपटून फेकण्याची वेळ आली. ज्या शेतात लाखभर उत्पन्न येईल, त्याच शेतातले पीक उपटून फेकण्यासाठी चंद्रकांत याला खिशातून पैसे खर्च करावे लागले.
गेल्या वेळी कर्ज काढले मात्र कपाशीला भाव मिळाला नाही, आहे त्या भावात कपाशी विकावी लागली, आता पुन्हा लाख रुपये कर्ज काढले, आणि त्या शेतात कपाशी लागली, मात्र अतिवृष्टीमुळे पीक खराब झाले, नुकसान झालं, केवळ नुकसानच झालं नाही तर या शेतात हात सहा महिने कुठलही पिक घेता येणार नाहीये. त्यामुळे गेल्या वर्षी व आताही कर्ज काढून पिकांच नुकसान झाल्याने चंद्रकांत कर्जबाजारी झालाय. कर्ज फेडायचे कसे, आणि उदरनिर्वाह कसा करायचा हाच प्रश्न चंद्रकांत आणि त्याच्या आईसमोर उभा राहिला आहे, कर्ज ही चुकणार नाही, आणि जगण थांबणार नाही, त्यामुळे दोन्ही माय लेक दुसऱ्याच्या शेतात मिळेल ते काम मजुरीवर करण्यासाठी जात आहे, त्यातून काही पैसे जगण्यासाठी तर काही कर्जाची परतफेड करण्याची वाचवत आहे, स्वत:ची शेती असतांना या दोन्ही मायलेकांवर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याची दुर्देवी वेळ आली आहे. शासनाने मदत करावी, एवढच नाही तर आमच्याप्रमाणे जे इतर शेतकरी आहेत, त्यांनाही शासनाने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षाही या मायलेकाने व्यक्त केली आहे.
कधी पिकांना भाव मिळत नाही तर कधी ही अस्मानी सुलतानी अशा पध्दतीने बळीराजा हा नेहमीच चहूबाजूंनी संकटात सापडतो. हेच चंद्रकांत पाटील तरुणाच्या बाबतीतही घडलं आहे, शासनाची मदत मिळेल का, मिळाली तर मात्र ती पुरेशी ठरेल का? मदतीशिवाय जगायचं कसं ? अशी एक ना अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे निसर्गाला दोष द्यायचा की स्वत:च्या नशीबाला याचं विचारानेही मायलेकांची झोप उडाली आहे.