मुंबईः गणेशोत्सव पार पडताच राज्य सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सरकारकडून ४०हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त यांची पुन्हा मुंबईत बदली झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र पोलिस दलात बदल करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करु नयेत अशी विनंती पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर पडल्या होत्या.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली होणार याबाबत महिन्याभरापासून अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी झाली. राज्य सरकारच्या आदेशानुसार, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था या पदी नियुक्ती झाली आहे. तर, नांगरे पाटील यांच्या पदावर दीपक पांडे हे पदभार स्विकारणार आहेत. याशिवाय नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची तुरुंग महानिरीक्षकपदी बदली झाली असून, प्रताप दिघावकर हे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. मिलिंद भारंबे यांची गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार कृष्णप्रकाश हे सांभाळणार आहेत. तर, अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here