नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबतच नाहीए. करोनाचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. देशातील करोनाच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण हे फक्त पाच राज्यांमध्ये आहेत. आणि या पाच राज्यांतील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी २५ टक्के करोना रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी १२ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. करोना व्हायरसने मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी ३७ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. इतकेच नव्हे तर करोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे या पाच राज्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत.

करोना रुग्णांच्या मृत्यूदरात कर्नाटकमध्ये ९.५ टक्के वाढ आणि दिल्लीत ५० टक्के इतकी वाढ दिसून आली आहे, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. दिल्लीची संख्या वाढत आहे, याबद्दल काहीही शंका नाही. पण सरकारने आर्थिक उलाढाल सुरू करण्यासाठी नियोजित दृष्टीकोन स्वीकारला आहे. आता पुन्हा केंद्राचे लक्ष दिल्लीवर आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकार नायब राज्यपालांच्या संपर्कात आहे, असं आरोग्य सचिव राजीव भूषण म्हणाले.

आतापर्यंत देशात ४.५० कोटी करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त करोना उपचार घेत २९.७० नागरिक बरे झाले आहेत. देशात सध्या करोनाच्या ८.१५ लाख अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या तिप्पट झाली आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.

१३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या तीन आठवड्यांमध्ये दररोज सरासरी ६.८ टक्के नवीन रुग्णांमध्ये घट दिसून आली आहे. तसंच दर आठवड्याला महाराष्ट्रात ११.५ टक्क्याने करोनाच्या मृत्यूदरात घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

करोनामुक्त झालेल्या नागरिकांच्या प्रतिकारशक्तीबाबत आरोग्य मंत्रालयाला प्रश्न विचारला गेला. ही प्रतिकारशक्ती ५-६ महिन्यांपासून ते पुढील काही वर्षेही राहू शकते. पण तरीही नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे, असं राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं.

लक्षणं दिसत नसलेले रुग्णांमधून ३ ते ४ दिवस व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही, असं आयसीएमआरच्या महासंचालकांनी सांगितलं.

तुम्ही सायकल चालत असाल किंवा मॉर्निंग वॉक करत असाल आणि तेही गटाने किंवा समूहाने तर तुम्हाला मास्क घालणं गरजेचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. पण एकटेच सायकल चालवत असल्यास मास्क घालणं तितकसं महत्वाचं नाही. तरीही सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here