सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सातत्यानं वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिनं सुरुवातील बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली होती. त्यानंतर थेट राजकीय भूमिका घेत मुंबई पोलीस व राज्य सरकारवर टीका केली. ‘मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,’ असं तिनं म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. ‘मुंबईत भीती वाटत असेल तर आणि कोणाला इतर राज्यांची सुरक्षा हवी असेल तर चंबूगबाळे आवरून निघून जावं,’ असं त्यांनी सुनावलं होतं. त्यावर कंगनानं कांगावा करत संजय राऊत यांनी मला धमकी दिल्याचं म्हटलं आहे. मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय,’ असं ट्वीट तिनं गुरुवारी केलं होतं.
कंगनाच्या या कांगाव्याला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. तिला काही गोष्टींची जाणीवही करून दिली आहे. ‘मुंबई हे तेच शहर आहे, ज्या शहरानं बॉलिवूड स्टार बनण्याचं तुझं स्वप्न पूर्ण केलं. अशा जबरदस्त शहराबद्दल आदर व्यक्त करावा अशी अपेक्षा कुणीही करेल. पण तू मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करतेस हे धक्कादायक आहे,’ असं रेणुका शहाणे यांनी कंगनाला सुनावलं आहे.
मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचाही रेणुका शहाणे यांनी अशाच कठोर शब्दांत समाचार घेतला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times