लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकारवर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगनाला भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल, असं आठवले यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणावरून राज्यसरकारवर केलेली टीका असो, याप्रकरणी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगनाला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील. असा इशाराही त्यांनी दिला.
कंगनाने ट्विट करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ असं ट्विट केल्यानंतर कंगनानं आणखी एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. ‘मुंबई येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा’, असं थेट आव्हान कंगनानं दिलं होतं. त्यावर राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. हे वचन, अशी टीका केली आहे. तत्पूर्वी राऊत यांनी दुपारी मीडियाशी संवाद साधताना कंगनावर जोरदार हल्ला चढवला होता. माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. पण मुंबई तुम्हाला पोसते. सर्व काही देते. ज्या मुंबईने हुतात्मे दिले. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोलू शकत नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो, असा इशारा राऊत यांनी दिला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times