शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’, या स्वतःच्या राजकीय वाटचालीवर आधारित पुस्तक लिहिले असून त्यामध्ये हे सर्व दावे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन झाले.
राज्यात २०२९ महाविकास आघाडीची सत्ता आली. यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिले, महत्त्वाची खाती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला दिली. वास्तविक सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याची संधी असताना उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. हे काहीसे आश्चर्यजनक होते असे कीर्तिकर यांनी या पुस्तकात नमूद केले आहे.
स्वतः पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते. शिवाय तीन पक्षांचे सरकार चालवण्याची कठीण कसरत तर होतीच. त्यामुळे संघटना बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे अशी कुजबूज संघटनेत सुरू होती. उद्धव ठाकरे नाहीत तर किमान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी तरी शिवसैनिकांना भेट द्यावी, अशी आशा असताना तीही फोल ठरली. आदित्यने संघटना बांधणीची सूत्रे हातात घेऊन राज्यभर फिरणे अपेक्षित असताना मंत्रिपद स्वीकारले. ज्याचा नकारात्मक परिणाम संघटनेवर झाला आणि पक्ष पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिला याकडे पुस्तकात लक्ष वेधले आहे.
शिवसैनिकांची पक्षनेतृत्वाशी भेट होत नसताना एकनाथने शिवसैनिकाला आधार दिला. दरबारी मंडळी मात्र कायम एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कारस्थान रचत आली. अगदी २०१४ नंतर मिळणारे शिवसेनेच्या वाट्याचे उप मुख्यमंत्रिपद देखील केवळ एकनाथ शिंदेंना द्यावे लागेल, या विचाराने ते पक्षाने स्वीकारलेच नाही. राजकारणात कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो आणि पक्ष मोठा झाला तर पक्षाचा नेता. याचा विसर दरबारी मंडळींना पडला असेही म्हटले आहे.
पक्षातील ४० आमदार, १२ खासदार जर समेट घडवून भाजपसोबत युती करावी असे मत मांडत असतील, तर साहजिकच नेतृत्वाकडून पक्षाचे हित साधणारा निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे. परंतु पक्षाचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, महाविकास आघाडी सोडणार नाही, हे मात्र न कळण्याच्या पलीकडे होते. उद्धव ठाकरेंवर माझा वैयक्तिक कसलाही आकस नसून त्यांच्या कार्यशैलीवर माझा आक्षेप आहे असेही त्यांनी म्हटले आहे.