एकनाथ खडसे यांनी शनिवारी दुपारी आपल्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पूर्वी पक्षात आक्रमक शैलीत बोलायचे. दुसऱ्या बाजूला भाऊसाहेब फुंडकर यांची तोफ चालायची. तिकडे नागपूरला गेले तर नितीन गडकरी यांचा तोफखाना एकदम जोरात चालायचा. इकडे गिरीश बापट, विनोद तावडे, पंकजा मुंडे मी स्वतः तसेच हरिभाऊ बागडे असे अनेक नेते सरकारविरोधात आवाज उठवत असत. त्यावेळी सरकार गांगरून जायचे. एकदम हादरून जायचे. मात्र, आता महाराष्ट्रात सर्व नेतेमंडळी गुपचूप बसली आहे. सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत, पंकजा मुंडे काही बोलत नाही. तुम्ही निवडून दिलेले जे पदाधिकारी आहेत, चंद्रकांत पाटील यांच्यासह ते कधीतरी बोलतात. आताच्या घडीला सरकारविरोधात आक्रमक भाषा पाहिजे, त्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत खडसेंनी फडणवीस यांच्या नेतृत्त्वावरच शंका उपस्थित केली आहे.
खडसेंच्या पुस्तकाचे नाव ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’
खडसे यांनी याचवेळी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळेच माझ्यावर अन्याय झाल्याचे खडसे म्हणाले. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री दीड वाजता भेट दिली. कृपाशंकर सिंह त्याला घेऊन गेले होते. ही भेट कशासाठी होती?, असा सवाल फडणवीस यांनी केला. मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, असा आरोपही खडसे यांनी केला. फडणवीस तसेच पक्षाकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध पुस्तक लिहिणार असल्याची घोषणाही खडसे यांनी केली. विशेष म्हणजे खडसे यांच्या या पुस्तकाचे नावही ठरले आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणार असल्याचे खडसे म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times