शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करून कंगना राणावतला हा इशारा दिला आहे. राऊत यांनी हे ट्विट हिंदीत केलं आहे. त्यात त्यांनी कंगनाचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचा संपूर्ण रोख हा कंगनावरच असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ,’ असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या आठवडाभरापासून राऊत आणि यांच्या दरम्यान शाब्दिक चकमकी झडत आहेत. कंगनानेही राऊत यांचं नाव घेता त्यांच्यावर आणि तिच्या इतर टीकाकारांवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबई किंवा महाराष्ट्र कुणाच्या बापाची नाही. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. हिंमत असेल रोखून दाखवा, असं कंगनाने म्हटलं आहे. त्यामुळेच राऊत यांनी कंगनाला ट्विटमधून हे उत्तर दिल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.
अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणणार का?
कंगना राणावत महाराष्ट्र आणि मुंबईची माफी मागितली तर मी विचार करेल. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असं सांगतानाच कंगना मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणते. अहमदाबादला मिनी पाकिस्तान बोलण्याची तिची हिंमत आहे का? असा सवाल राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मुंबई आमची आई आहे. मुंबादेवी आमची आई आहे. मुंबईत खाऊन-पिऊन कमाई करून जर मुंबईबद्दल कोणी अपशब्द वापरत असेल तर आम्ही कसं ऐकून घेणार? असा सवाल करतानाच तिनेच आधी मुंबई आणि मराठी माणसांची माफी मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली आहे. यावर कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं कंगनानं तिच्या नवीन ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच, ‘मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा, असं थेट आव्हान दिलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times