म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. चारही धरणांमध्ये सध्या ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून सिंचनासाठी, वरसगाव आणि पानशेत धरणांमधून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे.पुणे शहराला आणि जिल्ह्यातील शेतीला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून एकूण २७.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत २९.४ टीएमसी (९९.६१ टक्के) पाणीसाठा जमा झाला होता. दिवसभरात टेमघर धरण परिसरात २५ मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात २० मिमी, पानशेत धरण परिसरात १८ मिमी आणि परिसरात १३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. वरसगाव आणि पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणांमधून ६०० क्युसेक वेगाने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे.खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी नवीन मुठा कालव्याद्वारे १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणात सध्या ४५ टक्के, टेमघर धरणात ८० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सध्या पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडिवळे आणि वीर धरणांमधून कालवा आणि नदीद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात केवळ तीन मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या धरणात सध्या ९.६४ टीएमसी (१७.९९ टक्के) पाणीसाठा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.