देशभरात २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार ३ हजार १६७ वाघांची नोंद झाली आहे. वाघांच्या वाढत्या संख्येचे आशादायी चित्र यानिमित्ताने दिसले. हे घडत असतानाच वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकारीत आणि नैसर्गिकरित्या वाघांचे मृत्यूही वाढले आहेत. मध्य प्रदेशात सर्वाधिक ३१, तर महाराष्ट्रात २८ वाघांचा मृत्यू झाला. यापूर्वी २०२१मध्ये सर्वाधिक १२७ वाघांचा मृत्यू झाला होता. यंदा प्रथमच ही संख्या अवघ्या आठ महिन्यांतच ओलांडली गेली आहे. आणखी तीन महिन्यांचा अवघी असल्याने ही मृत्युसंख्या दीडशेवर जाण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त होऊ लागला आहे.
राज्यात एकूण ४४४ वाघ असून, सर्वाधिक ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ९७ तर मेळघाट व्याघ्रप्रकल्पात ५७ वाघ आहेत. एकट्या विदर्भातील वाघांची संख्या ४४० इतकी आहे. पण, यातील अठ्ठावीस वाघांचे मृत्यू नोंदविले गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाघांच्या शिकारींविरोधात स्वांतत्र्यप्राप्तीनंतर सत्तरच्या दशकात आवाज उठविला गेला. वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणवादी संस्थांनी पहिल्यांदा एकत्र येऊन वाघांच्या शिकारीविरोधात ओरड सुरू केली. त्यानंतर सरकारने पावले उचलण्यास प्रारंभ केला. परिणामी शिकारीच्या घटनेत मागील काही वर्षांत घट झाली. पण, शिकारीच्या घटना जारीच असल्याने हा चिंतेचा विषय मानला जात आहे.
चार शिकारी उघड
राज्यात चालू वर्षांत चार वाघांच्या शिकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंतरराज्यीय शिकारींच्या हालचाली गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये होत्या. अटकेतील शिकारी टोळीच्या खुलाशातून सदर गंभीर बाब समोर आली आहे. सावली वनपरिक्षेत्रातील राजोली फाल व गडचिरोली जिल्ह्याच्या आंबेशिवणी येथे प्रत्येकी दोन वाघांची शिकार झाली होती. राज्यात ही स्थिती असताना मागील तीन वर्षांमध्ये मध्य प्रदेशची कामगिरी यंदा थोडी सुधारली आहे.
व्याघ्रमृत्यूचा चढता आलेख
वर्ष———संख्या
२०१८- १०१
२०१९- ९६
२०२०-१०६
२०२१-१२७
२०२२–१२१
२०२३- १३२ (आतापर्यंत)