राजुरी येथील अमर पडवळ यांना लहानपणापासून चित्रपट क्षेत्राची प्रचंड आवड. त्यामुळे त्यांनी शिक्षण देखील त्या क्षेत्राशी निगडित घेतले. त्यांनी DIPLOMA IN VISUAL EFECTS या विषयात आपले शिक्षण पूर्ण केले. या क्षेत्रात त्यांनी सिनेमॅटोग्राफर, सहाय्यक दिग्दर्शक ते थेट दिग्दर्शकापर्यंत मजल मारली. या कालावधीत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेले रौंदळ, पंचायत, वीर सावरकर, स्क्रू ड्रायव्हर, बोधी यासारखे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र यशाच्या शिखरावर असताना २०१९- २० साली जागतिक करोना महामारी आली आणि त्यांनाही या महामारीचा मोठा फटका बसला.
त्यामुळे सर्वच बंद झाले होते. सर्वजण त्यावेळी घरात असल्याने दोन-अडीच वर्ष काम नव्हते. चित्रपटसृष्टीत परत जावे की शेतीशी निगडित व्यवसाय करावा हा विचार त्यांच्या मनात घर करू लागला. त्यावेळी शेतीशी निगडित अनेक व्यवसायांचा त्यांनी अभ्यास केला. अभ्यास करता करता त्यांनी शेतीशी निगडित व्यवसाय करण्याचे ठरवले. आणि त्यांनी मशरूमचा व्यवसाय सुरु केला. पण त्यासाठी जागा पुरेशी नव्हती. त्यावेळी त्यांनी गावातच त्यांच्या नातेवाईकांकडे एक शेड भाड्याने घेतले. आणि त्यात त्यांनी मशरुमची शेती विकसित केली. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाने त्यांनी हा व्यवसाय उभा आहे. “निर्वाना फ्रेश” नावाची कंपनी सुरू करून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.
अमर पडवळ यांनी दोन वर्ष सातत्याने मशरूम उत्पादनात वेगवेगळे प्रयोग केले असून हे कुटुंब वेगवेगळ्या पद्धतीचे व प्रकारचे मशरूम उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये Oyster Mushroom आणि त्याची उप-उत्पादने अशा प्रकारचे मशरूम त्यांच्याकडे तयार होत आहे. ते नुसते तयारच होत नाहीत, तर ॲमेझॉन सारख्या इंटरनॅशनल कंपनीद्वारे ते इतर देशात देखील वितरित केलेही जात आहे.
अमर पडवळ यांच्या निर्णयात त्यांच्या पत्नी अक्षता पडवळ यांचा देखील मोलाचा वाटा असून त्या पतीच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्यामुळे त्यांना हे यश मिळाले असल्याचे अमर सांगतात. या मशरूम शेतीत त्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. अक्षता या देखील उच्चशिक्षित आहे. त्यांच्या मशरुमला प्रति दिवस १० किलो एवढे उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या निर्णयाचा त्यांना चांगला फायदा झाला आहे.
कशी केली मशरूमची लागवड?
अमर यांनी नाशिक येथून १० किलो मशरूमचे बियाणे आणले. त्यांनी ते एक किलोच्या पिशवीमध्ये एक किलो भुसा भरून त्यामध्ये १०० ग्रॅम बियाणे टाकून ते निर्जंतुक करुन पॅंकिंग करुन टाकले. सुमारे २० दिवसानंतर पॅकिंग केलेल्या पिशव्यांना ब्लेड मारल्यानंतर एका किलोला ३ किलो मशरुम निघाले. यासाठी ६० ते ७० रुपये खर्च आला. यामधून सर्व वजा करता २५ ते ३० हजार रुपये नफा मिळाला. त्यामुळे आता पडवळ यांनी जवळपास ८० किलो बियाणेचे मशरूम बनवले आहे.