कानपूर: गावातील शेतात जमिनीत गाडलेले जिवंत नवजात अर्भक गावकऱ्यांना सापडले. या घटनेने साऱ्या गावात एकच खळबळ माजली. गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मुसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलंदर गावचं हे प्रकरण आहे. गावातीलच कुठल्या महिलेने या जिवंत अर्भकला मातीत गाडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, शेतातून जात असलेल्या ग्रामस्थांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून ग्रामस्थ त्या दिशेने गेले. यावेळी त्यांनी जे दृश्य पाहिले ते पाहून त्यांना धक्काच बसला. लहान बाळाच्या रडण्याचा आवाज हा जमिनीखालून येत असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तसेच, त्याचा एक पाय जमिनीच्या बाहेर दिसत होता.
त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून माती बाजुला केली आणि बाळाला बाहेर काढले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच, बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळ निरोगी असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुमारे ८ ते ९ तासांपूर्वी मुलाचा जन्म झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
सीओ रविकांत गौर यांनी सांगितले की, पुलंदर गावातील लोक शेताकडे जात होते. यावेळी त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांना जमिनीखालून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचं त्यांनी पाहिले. यानंतर लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना
पोलिसांनी घटनास्थळ गाठून बाळाला देवीपूर रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. बाळ निरोगी आहे. त्याच्या देखभालीसाठी CWC कानपूर देहाटला ही माहिती देण्यात आली आहे. तसेच गावप्रमुखाच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात येत आहे.