अहमदनगर : न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जरी कोपर्डीतील आरोपींना फाशी झाली नाही तरी देवाजवळ न्याय होतो, अशा भावना कोपर्डीतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या आत्महत्येनंतर कोपर्डीतील नागरिकांनी व्यक्त केल्या. कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१६ रोजी १५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. गावातीलच तीन युवकांनी मिळून तिचा खून केला होता. त्यानंतर न्यायालयाने तिघांनाही याप्रकरणी दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. परंतु आरोपींनी या शिक्षेला वरील न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नव्हती. हे सर्व आरोपी पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

कोपर्डी निर्भया अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोपर्डी गावात अनेक वेळा आंदोलने झाली. आताही जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना कोपर्डीतूनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यामध्येही या आरोपींनी तातडीने फाशी द्यावी, ही मागणी करण्यात आली होती. त्यादरम्यानच आज सकाळी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुख्य आरोपी जितेंद्रने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

कोपर्डी प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे याची येरवडा जेलमध्ये आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवलं
जितेंद्रच्या आत्महत्येनंतर कोपर्डी गावातल्या नागरिकांमध्ये उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याची भावना होती. न्यायव्यवस्था आणि सरकार कमी पडले. पण वरच्या देवाच्या दारात न्याय आहे, अन्याय नाही. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जरी कोपर्डीतील आरोपींना फाशी झाली नाही तरी देवाजवळ न्याय होतो, हा नियम सर्वांनाच लागू आहे. त्याप्रमाणे आमच्या भगिनीचे लचके तोडणाराचा न्याय झाला. शेवटी हरामखोराला फाशीच घ्यावी लागली. निसर्गाने न्याय दिला आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू असताना, कोपर्डी ग्रामस्थांच्या मागणीची निर्सगाने दखल घेतली आणि त्यामुळेच आज ही घटना घडली, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया कोपर्डीमधील नागरिक तात्या सुद्रिक यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
एक दिवस काय आणि हजार दिवस काय…. कोर्टात बाजू मांडताना कोपर्डी प्रकरणातला आरोपी काय म्हणाला होता?
आरोपींना फाशी द्या, कोपर्डीत आंदोलन सुरू होते…

ज्या कोपर्डी गावातील घटनेपासून मराठा आंदोलनाची सुरवात झाली, त्या कोपर्डी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकण्यात आले होते. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कोपर्डीत मंगळवारपासून (५ सप्टेंबर) ग्रामस्थ उपोषणला बसले होते. याला जोडूनच कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा आणि दुष्काळ निवारण उपययोजनांसारख्या मागण्यांचाही समावेश आंदोलनात करण्यात आला होता. अखेर सहा दिवसांच्या आंदोलनानंतर सरकारने आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी शनिवारी आंदोलन मागे घेतले.

कोपर्डीची घटना काय?

१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला होता. गावातीलच तीन आरोपींनी गुन्हा केला होता. यामध्ये जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. जिल्हा न्यायालयात अवघ्या १६ महिन्यांत निकाल लागला. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. तीनही आरोपींना खून आणि बलात्कार या आरोपांसाठी फाशीची शिक्षा सुनावली.

हज हाऊसची उभारणी धर्मनिरपेक्ष, मिलिंद एकबोटेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
१३ जुलै २०१६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नववीत शिकणारी मुलगी आपल्या आजोबांच्या घरून मसाला घेऊन सायकलवरून घराकडे निघाली होती. त्यावेळी आरोपी शिंदे याने तिला तुकाई लवण वस्ती येथे अडवून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर खून केला. तिचे दोन्ही हात मोडलेले आढळून आले होते. आज आत्महत्या केलेला आरोपी जितेंद्र शिंदे हा कोपर्डीतीलच रहिवाशी होता. तो गावातील वीट भट्टीवर कामाला होता. त्याचे आईवडीलही मजुरी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here