म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: प्रगती मैदानावरील जी २० शिखर परिषदेदरम्यान शनिवारी झालेल्या पावसाने भारत मंडपम परिसरातही तळी साचली. दिल्लीत शनिवारी दिवसभर व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रगती मैदानावर ठिकठिकाणी पाणी साचले. पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) साचलेल्या पाण्याचा रात्रीच तातडीने निचरा करण्यात आला असा खुलासा केला आहे. मात्र ‘हजारो कोटी रुपये खर्चून दिखाव्यासाठी उभारलेला विकास तरंगू लागला,’ अशा खोचक शब्दांत काँग्रेसने याबाबत टीका केली.

शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी सकाळी झालेल्या पावसानंतर भारत मंडपाबाहेर पाणी साचल्यावर ते काढण्यासाठी नवी दिल्ली महापालिकेने (एनडीएमसी) तातडीने पाणी उपसणारे सुमारे १०० पंप आणून परिस्थिती आटोक्यात आणली. रात्री आणि सकाळी पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती सामान्य करण्यासाठी लगोलग शेकडो कर्मचारी तैनात केले गेले. एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले, ‘पावसाची शक्यता गृहीत धरून आम्ही १०० पंप अशा ठिकाणी आधीच बसविले होते जेथे पाणी साचण्याची शक्यता होती. याशिवाय ५० फिरते पाण्याचे पंपही तैनात आहेत.’

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ‘एक्स’वर पाण्याने भरलेल्या भारत मंडपमचा व्हिडिओ शेअर करताना म्हटले, ‘आज थोड्याशा पावसानेही सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘भारत मंडपम’मध्ये ‘विकास’ तरंगताना दिसला! इथे यापेक्षा जास्त पाऊस पडू नये, जी-२० परिषद सुरक्षित पूर्ण होवो हीच देवाकडे प्रार्थना ते पूर्ण होऊ दे!’ तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ खोटा असल्याचा सरकारने खुलासा केला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने रविवारी म्हटले आहे, ‘जी २० शिखर परिषदेच्या ठिकाणी पाणी साचल्याचा दावा एका व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. मात्र, तो अतिशयोक्तीपूर्ण आणि दिशाभूल करणारा आहे. रात्रभर पडलेल्या पावसानंतर पाणी उपसणारे पंप सुरू केल्याने प्रगती मैदानावरील मोकळ्या भागातील किरकोळ पाणी साचले त्याचा निचरा केला गेला. सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी साचलेले नाही.’

PM मोदींनी जो बायडन यांना दिली कोणार्क सूर्य चक्राची माहिती

दरम्यान, दिल्लीत शनिवारपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे गेले महिनाभर जीव नकोसा करणाऱ्या उष्ण तापमानात किंचित घट झाली आहे. किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअसवर आले असून ते सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी आहे.

यांचे व्हिडिओ आणि त्यांचेही!

‘मोदी सरकारने प्रगती मैदानाच्या परिसरात गरिबांना ‘पडद्या’ने झाकले आहे पण सरकार आपल्या गैरकृत्यांवर पांघरूण घालू शकत नाही,’ असे सुरजेवाला यांनी लिहिले. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. त्या स्पर्धेवेळी शीला दीक्षित सरकारच्या मंत्र्यांनी क्रीडानगरीच्या रस्त्यांवरील झोपड्या झाकल्या होत्या व काही ठिकाणची घरेही पाडण्यात आली होती, असे या व्हिडिओंमध्ये दिसत आहे.

G20 परिषद: बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; ताफ्यातील कार भलत्याच हॉटेलात शिरली अन् मग…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here