राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरून पनवेल ते इन्सुलीपर्यंतच्या भागात वाळू अथवा रेतीने भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये गणेशोत्सवाच्या पुर्वतयारीचा प्रवास व मुर्तीचे आगमन करण्यासाठी चाकरमानी कोकणात येणार असल्याने १६ सप्टेंबर रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. पर्यंत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे.अशा वाहनांची वाहतुक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.
५ व ७ दिवसांच्या गणपतींचे व गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर काही चाकरमानी परतीचा प्रवास करत असल्याने २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. पासून २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. पर्यंत अवजड वाहनांची वाहतूकपुर्णतः बंद राहणार आहे. अनंत चथुर्दशीला विसर्जन झाल्यानंतर परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास होवू नये यासाठी सकाळी ८ वा. पासून २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. पर्यंत वाहतुकीस बंदी असणार आहे. अवजड वाहनांना २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. पासून ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. पर्यंत वाहतूकीस परवानगी असणार आहे. तसेच सर्व वाहने २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. नंतर नियमित प्रवास करणार आहेत.
मात्र हे निर्बंध दूध, पेट्रोल/ डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन, अन्न धान्य व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाहीत. तसेच महामार्ग रुंदीकरण व रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य माल इत्यादी ने- आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. या संदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग अथवा महामार्ग पोलिसांनी प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. असे आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले आहेत.