मिळालेल्या माहितीनुसार, अकोट येथील सिंधी कॉलनीतील सिंध नवयुवक मंडळ हे काल दुपारी अकोट येथून गांधीग्राम इथे पूर्णा नदी पात्रात पवित्र जल आणण्यासाठी निघाले होते. मध्यरात्री जल घेऊन परतीच्या मार्गावर असताना अकोट गांधीग्राम मार्गावरील पळसोद फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या ४०७ टेम्पोने या मंडळातील शिवभक्तांना उडवले.
या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले. यापैकी एकाच्या डोक्यावर गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश मनोहरलाल मोटवानी असं मृत्यू पावलेल्या तरुण शिवभक्ताचं नाव आहे. तर सुरज बंगेशवर विरवानी असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता, मात्र काही दूर अंतरावर पोलिसांनी वाहनाला ताब्यात घेतलं आहे, असे समजते.
दरम्यान आज अकोटवरुन अनेक कावड आणि पालखी शहरातून मिरवणूक काढतात, अन् गांधीग्राम इथून आणलेलं पवित्र जल तपेश्वर मंदिरात अभिषेक करण्यासाठी जातात. सिंध नवयुवक मंडळ हे देखील काल गांधीग्राम येथे पूर्ण नदीतून पवित्र जल आणण्यासाठी निघाले. अन् आज श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी तपेश्वर मंदिरात हे जल अभिषेक करणार होते. मात्र वाटेतच या मंडळावर काळाने घाला घातला. या अपघाताच्या बातमीनंतर कुटुंबीयांसह अकोट तालुक्यावर दुःखाचं सावट पसरलं आहे. अनेक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
कावड व पालखी यात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. अकोट राज्य महामार्गावरील वाहतूक व अकोला दर्यापूर मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. त्या अनुषंगाने रविवार १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून ते सोमवार ११ सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंत (अकोला शहराकरिता ११ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत) पर्यायी मार्गाने बदलाचे आदेश जिल्हाधिकारी प्रभारी अनिल खंडागळे यांनी निर्गमित केले आहेत. दरम्यान अकोटकडून देखील रविवारी दुपारपासून गांधीग्रामपर्यत कावडधाऱ्यांची धामधूम असते. त्यामुळे या मार्गावर जड वाहने येण्यास सक्त मनाई आहे, असे असताना ४०७ सारखे जड वाहन या मार्गावर आलेच कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.