म. टा. प्रतिनिधी, नाशिक: गेल्या महिन्यात पावसामुळे भाज्यांनी शंभरी गाठल्याने अनेक घरांमध्ये दिवसाआड वरण-भाताचा दरवळ पसरत होता. मात्र, आता भाज्यांचे दर आवाक्यात येत असताना गेल्या काही दिवसांपासून तांदळासह डाळींचेही दर वाढले आहेत. त्यामुळे वरण-भाताची चव चाखताना सर्वसामान्यांना विचार करावा लागत आहे. जगभरातील अनेक देशांना भारतातून तांदळाची निर्यात होते. जिल्ह्यातील अनेक भागांत तांदळाचे उत्पादन होते. मात्र, दोन वर्षांपासून तांदळाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे गतवर्षापासून तांदळाच्या दरांत सातत्याने वाढ बघायला मिळत आहे. त्यातही प्रामुख्याने बासमती तांदळाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. कर्नाटक, गोंदिया, छत्तीसगड, गडचिरोली, पंजाब, दिल्ली यांसारख्या राज्यांतून नाशिकमध्ये तांदूळ मागवला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथील शेतकरी पांरपरिक बासमती तांदळाऐवजी ११२१ बासमती तांदळाच्या लागवडीकडे वळाले आहेत. तीन ते चार वर्षांपासून पारंपरिक बासमतीची लागवड कमी होत आहे. याचा परिणाम आवकेवर झाला असून, दर वाढले आहेत.
बाजारात नवीन तुरडाळ दाखल होण्यासाठी अजून तीन ते चार महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे बाजारात तूरडाळीचा तुटवडा असल्याने महिन्याभरात तूरडाळही किलोमागे ३० ते ५० रुपयांनी महागली आहे. बाजारात तूरडाळ १६५ ते १७० रुपयांनी विक्री होत आहे. तर मूगडाळ ११० ते ११५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.
भाज्यांची किरकोळ दरवाढ
काही दिवसांपूर्वी पावसाचे आगमन झाल्याने भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे दोन दिवसांत बाजार समितीत भाज्यांच्या दरांत किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले. भाजी बाजारात भाज्यांच्या दरांत प्रतिकिलो पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून कोथिंबिरच्या दरांतही मोठी चढ-उतार बघायला मिळत आहे.