म. टा. प्रतिनिधी, नागपूर: राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूरमध्ये दिली. मराठा समाजाला आरक्षण देताना ते ओबीसी कोट्यातून देण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने मनात कोणताही गैरसमज ठेवू नये, असेही फडणवीस म्हणाले. राज्यातील कोणत्याही समाज घटकावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमचे सरकार काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींमध्ये जी भीती आहे की त्यांचे आरक्षण कमी होणार, मात्र अशाप्रकारे सरकारचा कोणताही हेतू नाही. ओबीसी समाजाने गैरसमज करून घेऊ नयेत. दोन समाज समोरासमोर यावेत, असा निर्णय राज्य सरकार कदापि घेणार नाही. कोणत्याही समाजाच्या नेत्याने काहीही विधान करताना अन्य समाज दुखावणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे.’

मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यास ओबीसी महासंघाचा विरोध, आंदोलनाचा इशारा

‘लोकशाहीत एखादे उपोषण करणे, प्रश्न लावून धरणे याला मान्यताच आहे. लोकशाहीची ती पद्धत आहे; परंतु असे प्रश्न सोडवण्यासाठी काय मार्ग काढता येईल यावर विचार करायला हवा. सरकारला कायद्याचा, सर्वोच्च न्यायालयाचा विचार करावा लागतो. आम्ही आरक्षण दिले तरी ते कायद्याच्या चौकटीवर टिकले पाहिजे. नाहीतर आम्ही एखादा निर्णय घेतल्यास समाज म्हणेल की आमची फसवणूक केली. मराठा आरक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, मला विश्वास आहे की सर्वांनी सकारात्मक विचार केला तर समाजाचे भले होईल,’ असेही फडणवीस म्हणाले.

‘सर्व मागण्यांचा एकत्रित विचार करणार'”

‘सरकार आणि विरोधी पक्षाने मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. आजच्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे, की कोणत्या मार्गाने पुढे जाता येईल. मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आले आहेत. इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या त्याच मागण्या आहेत. या सर्व मागण्यांचा नीट एकत्रित विचार करून यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा विचार केला जाईल,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.

लाठीमार करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन करणार, मनोज जरांगेंनी उपोषण मागं घ्यावं: एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here