हे सर्वजण घाटकोपरहून मरिन ड्राइव्ह येथे फिरण्यासाठी निघाले होते. त्यांनी मद्यप्राशन केले होते. शीव उड्डाणपुलावरून उतरत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ही सीएनजी कार असल्याने धडकेमुळे गाडीत इंधनगळती झाली आणि तिला आग लागली. धडकेच्या मोठ्या आवाजाने आंबेडकर रोडवरील गंगाविहार हॉटेल परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी व इतर टॅक्सीचालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाघेला बंधू पेटत्या गाडीतून वेळीच बाहेर पडू न शकल्याने ते मोठ्या प्रमाणात भाजले होते.
स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल जवानांनी गाडीतील सर्वांना बाहेर काढून सायन रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच वाघेला बंधूंचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी दिली. तर, हर्ष कदम (२०), रितेश भोईर (२५) आणि कुणाल अत्तार (३३) हे जखमी झाले आहेत. गाडीला लागलेली आग अग्निशमन दलाने विझवली. दरम्यान, पोलिसांनी रक्ताचे नमुने घेतले असून त्यात मद्याचा अंश आढळून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही मित्र दारूच्या नशेत होते आणि फ्रीवेवर नाकाबंदी टाळण्यासाठी त्यांनी शीव येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने जाण्याचा निर्णय घेतला. वाघेला हे मानखुर्द येथील अणुशक्ती नगर येथील रहिवासी होते आणि अजय हा नौदलाच्या कॅन्टीनमध्ये खाजगी कॅटरिंगसाठी काम करत होता.
डावीकडचे दरवाजे जखडले
या अपघातात कारच्या डाव्या बाजूचे दरवाजे जाम झाले. त्यामुळे या तरुणांना बाहेर पडता आले नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. हर्ष कदम हा ६० ते ७० टक्के भाजला असून, रितेश भोईर आणि चालक कुणाल अत्तार हेही भाजले आहेत.
अत्तार आणि रितेश भोईर हे दोघे गाडीतून सर्वप्रथम बाहेर पडले. हर्ष कदम यांना बाहेरच्या लोकांनी पुढे ओढले. तिघांना सायन रुग्णालयात नेण्यात आले.
अजय वाघेला पुढच्या सीटवर होता आणि त्याच्या मागे त्याचा लहान भाऊ होता. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचताच दरवाजा तोडून भावांना बाहेर काढले.