वृत्तसंस्था, जम्मू: ‘भारताची एक इंचही जमीन चीनने बळकावलेली नाही,’ असे ठाम प्रतिपादन लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सोमवारी येथे केले. ‘भारतीय भूमीवर आक्रमण करण्याचे दु:साहस कोणी केल्यास, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास आपले लष्कर सिद्ध आहे,’ असेही ते म्हणाले. लष्कराच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही स्पष्टोक्ती केली.

‘लडाखमधील मोठा भूभाग चीनने गिळंकृत केला आहे,’ या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावर मिश्रा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर ते म्हणाले,’कोणाच्या विधानावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही; परंतु जी वस्तुस्थिती आहे, त्या विषयीच मी बोलत आहे. आपल्या सीमेवर मी प्रत्यक्ष पाहणी केली आहे व त्यावरून सांगू शकतो, की आपली एक इंचही जमीन चीनने बळकावलेली नाही. १९६२मध्ये जे घडले त्यावर बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच ताब्यात आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आपले लष्कर आता कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास सक्षम आहे. डोक्यावरून पाणी जात आहे, असे वाटल्यास आपले जवान कोणालाही चोख प्रत्युत्तर देतील. आपल्या जवानांचे मनोधैर्य अतिशय उंचावलेले आहे. आपल्या भूभागाच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करण्यास ते सिद्ध आहेत. आता आपल्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही आणि याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वास जाते,’ असेही त्यांनी नमूद केले.

सीमेवर चांदवडचा जवान विकी चव्हाण यांना वीरमरण; अंत्ययात्रेत वडील धाय मोकलून रडले


‘सर्व सामग्री स्वदेशी बनावटीची’

लष्करातून ब्रिगेडियर पदावरून निवृत्त झालेल्या मिश्रा यांनी या वेळी स्वानुभवही सांगितले. ‘मी १९६१मध्ये लष्कराच्या सेवेत रूजू झालो, तेव्हा आमच्या बटालियनच्या सामग्रीत काहीच देशी बनावटीचे नव्हते. आमच्या ३०३ रायफल्स या बर्मिंगहम येथून येत असत, तर लष्करी मोहिमांसाठीची विशिष्ट घड्याळे स्वित्झर्लंडमध्ये तयार होत असत. आता मात्र सर्व लष्करी सामग्री ही स्वदेशी बनावटीची आहे,’ असे ते म्हणाले.
बॅरेकच्या खिडकीतून पडून डोक्याला गंभीर इजा, वाशिमच्या सुपुत्राला सियाचीनमध्ये वीरमरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here