कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना सुरु असताना पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे आता खेळ थांबवण्यात आला आहे. पण पावसामुळे जर हा सामना रद्द झाला तर काय समीकरम असू शकते, हे आता समोर आले आहे.सध्याच्या घडीला गुणतालिकेत भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या तिन्ही संघांचे समान दोन गुण आहेत. पण नेट रन रेटच्या जोरावर भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. जर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला तर त्याला मोठा परीणाम या स्पर्धेवर होऊ शकतो. कारण जर आता हा सामना पावसामुळे रद्द झाला तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना समान एक गुण मिळेल. त्यानुसार भारतीय संघाचे तीन गुण होतील आणि ते गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम ठेवतील. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाचेही तीन गुण होतील आणि ते दुसऱ्या स्थानावर कायम राहतील. पण त्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना महत्वाचा समजला जात आहे. कारण हा सामना अंतिम फेरीत कोण पोहोचणार हे ठरू शकतो. या सामन्यापूर्वी श्रीलंकेचे तीन आणि पाकिस्तानचे दोन गुण असतील. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर श्रीलंकेचे चार गुण होतील आणि पाकिस्तानचे तीन गुण होतील, या गोष्टीचा अर्थ असा की जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येणार आहे. पण ह सामना पाकिस्तानने जिंकला तर श्रीलंका स्पर्धेबाहेर जाणार आहे. त्यामुळे आता यानंतरच्या सामन्यात नेमकं काय घडतं, यावर सर्व समीकरण अवलंबून असेल. या समीकरणानुसार भारताच्या पुढच्या मॅचमध्ये पाऊस पडला तर ते सहजपणे अंतिम फेरीत पोहोचतील. पावसाने या स्पर्धेत चांगलाच घोळ घातला आहे. त्यामुळे आता पावसामुळे जर यापुढे सामने रद्द झाले तर नेमकं काय होऊ शकतं, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे धाबे चांगलेच दणाणलेले असतील.