घोलप यांनी मुंबईत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर घोलप यांना दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले आहे. दोन दिवसात उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली नाही, तर पुढचा निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही घोलप यांनी दिल्याने त्यांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर महिनाभरानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामध्ये शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचाही समावेश होता. त्यामुळे राज्यातील लोकसभांसाठी उद्धव ठाकरेंकडून सध्या लोकसभानिहाय जागांचा आढावा घेतला जात आहे.
नाशिकसह शिर्डीची जागा परत मिळविण्यासाठी ठाकरेंनी शिर्डीतून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, शिर्डीच्या जागेवर लढण्यासाठी माजी मंत्री बबनराव घोलप यांनीही तयारी सुरू केली होती. ठाकरेंकडून वाकचौरेंना बळ दिले जात असल्याने घोलप नाराज होऊन त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता.
सोमवारी घोलप यांना ‘मातोश्री’वर बोलविण्यात आले होते. परंतु, त्यांची उद्धव ठाकरेंशी भेट होऊ शकली नाही. घोलप यांनी संजय राऊत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. घोलप यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याबाबतची तक्रारही त्यांनी संजय राऊत यांच्याकडे केली आहे.
“गेल्या ११ महिन्यात काय झाले याची माहिती मी संजय राऊत यांना दिली आहे. मला डावलले जात असल्याची भावना असून, दुष्काळ दौऱ्यापासून मला दूर ठेवण्यात आले आहे. राऊतांनी दोन दिवसात बैठक होईल असे आश्वासन दिले आहे. दोन दिवसांनंतर पुढचा निर्णय घेईन” असंही बबनराव घोलप म्हणाले