अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने त्याच्या मदतीस अन्य मित्राला बोलावले. मात्र, तो आला आणि तो येईपर्यंत ज्याने जखमी अपघातग्रस्ताला मदत केली त्याच्यावरच त्याने चाकूने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी वार करणाऱ्या युवकावर हत्येचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक सूर्यवंशी हे अपरात्री घणसोली पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून निघाले. ठाणे बेलापूर मार्गावर गाडी वळवत असताना महापेकडून ऐरोलीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली.
अपघातात दोघेही आपापल्या दुचाकीवरून खाली पडले. त्यात दुसरा दुचाकीस्वार संदीपकुमार याला जास्त मार लागला. त्याची अवस्था पाहून सूर्यवंशी यांनी त्याला रुग्णालयात पोहचवण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या दुचाकीवर बसवून गवळी रुग्णालयाच्या दिशेने निघाले. दरम्यान, संदीपकुमार यांनी त्याच्या मित्रांना मदतीस बोलावले. काही वेळाने त्यांची पत्नी आणि तिचा मानलेला भाऊ शुभम मिश्रा हे आले.
मात्र, ज्याच्यासोबत अपघात झाला तोच मदत करत आहे, हे कळल्यावर शुभम मिश्रा याने सूर्यवंशी याला ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे सूर्यवंशी हे दुचाकीवर पळून गेले. त्यांचा पाठलाग जखमी संदीपकुमार यांची पत्नी आणि मिश्रा यांनी केला. या पळापळीत गोठीवली गावात शिरताना सूर्यवंशी यांची दुचाकी घसरून ते खाली पडले. तसेच मिश्राचीही दुचाकी पडली. मात्र, मिश्रा मागेपुढे न पाहता सूर्यवंशी यांच्यावर तीन ते चार वार केले. यावेळी शुभमचा अन्य मित्र रणजित पांडे तसेच आसपासच्या लोकांनी मिश्रा याच्या तावडीतून सूर्यवंशी याला सोडवले आणि गवळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.