जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. २ सप्टेंबर रोजी गोकूळ जाधव याला तिसरी सुध्दा मुलगी झाली. जामनेर तालुक्यातील वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात ही प्रसूती झाली. आधीच मुली आणि आपल्याला तिसरे अपत्य मुलगीच जन्माला आल्याने गोकूळ याला चांगलाच संताप झाला. याच रागातून दुसऱ्या दिवशी गोकूळने त्याच्या जन्मलेल्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू टाकली. त्यानंतर तिला झोळीत झोपवून दिले. या घटनेत चिमुरडीचा मृत्यू झाला. आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाला असे त्याने कुटुंबियांना भासविले. त्यानंतर रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची गोकूळ याने विल्हेवाट लावली.
आशासेविका या गावात कोणत्याही घरात जन्म झाल्यानंतर जन्म झालेल्या बाळाची नोंद घेण्यासाठी घरोघरी जात असतात. त्यानुसार काल मंगळवारी आशासेविका जन्मलेल्या मुलीची नोंद घेण्यासाठी हरिहर तांडा या गावात गोकूळ जाधव याच्या घरी गेल्या. मात्र, त्यांना घरी जन्माला आलेली चिमुरडी दिसली नाही. या बाबतची कुठलीही वाच्यता न करता, त्यांनी थेट झालेल्या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली.
माहिती मिळाल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यात चिमुरडीच्या बाप गोकूळ याने चिमुरडीचा आजारपणाने मृत्यू झाला, असे सांगत उडवाउडवीचे उत्तरे दिली. डॉ. कुमावत यांनी गोकूळ याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यात त्याने आधीच दोन मुली आणि त्यात तिसरीही मुलगी जन्माला आल्याने तिला मारल्याची कबुली दिली. चिमुरडीची हत्या केल्यानंतर फर्दापूर ते वाकोद रस्त्याच्या नाल्याच्या परीसरात खड्डा खोदून चिमुरडीच्या मृतदेहाला दफन करत त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे सुध्दा समोर आलं आहे.
घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेची तातडीने गंभीर दखल घेत गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आधीच दोन मुली व त्यात तिसरीही मुलगी झाल्याच्या रागातून त्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिचा जीव घेतल्याची कबुली दिली. आज फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून घटनास्थळी भेट देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी बापाने चिमुरडीचा मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. त्या ठिकाणाहून मृतदेह उकरुन काढण्यात आला असून घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी पहूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.