कोलंबो: आशिया चषकात बांगलादेशनं भारताचा पराभव केला. अटीतटीच्या लढतीत बांगलादेशनं ६ धावांनी हरवलं. बांगलादेशनं भारतासमोर २६६ धावांचं आव्हान उभं केलं. प्रत्युत्तरादाखल भारताला ४९.५ षटकांत २५९ धावा केल्या. शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना बांगलादेशच्या बाजूनं फिरला. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला. त्याआधी सलामीवीर शुभमन गिलनं शतकी खेळी साकारली. पण ही खेळी व्यर्थ ठरली. सलामीला आलेल्या गिलनं १३३ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं १२१ धावांची खेळी साकारली. त्यानं अनेक महत्त्वाच्या भागिदाऱ्या रचल्या. गिल ४४ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर अक्षरनं किल्ला लढवला. पण तो बाद झाल्यानंतर बांगलादेशचा विजय निश्चित झाला. भारताला अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे गिलची शतकी खेळी वाया गेली. त्यामुळे ११ वर्षांनंतर एक अजब योगायोग पाहायला मिळाला.आशिया कपमध्ये भारताचा पराभव आणि त्यात शतक असा योगायोग केवळ दुसऱ्यांदा जुळून आला आहे. याआधी असा योगायोग सचिन तेंडुलकरसोबत घडला आहे. विशेष म्हणजे त्यावेळीही समोर बांगलादेशचा संघ होता. २०१२ मध्ये झालेल्या आशिया चषकात सचिननं १४७ चेंडूंमध्ये ११४ धावांची खेळी केली होती. त्यात त्यानं १२ चौकार आणि १ षटकार ठोकला होता. हा सामना मिरपूरमध्ये खेळवला गेला होता. त्यात बांगलादेशनं ४ चेंडू आणि ५ गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशनं आशिया चषकात केवळ दोनदाच भारताचा पराभव केला आहे. २०१२ मध्ये भारताला बांगलादेशविरुद्ध पहिला पराभव पाहावा लागला. त्यानंतर आता ११ वर्षांनंतर बांगलादेशनं भारताला पराभूत केलं आहे. या दोन्ही सामन्यांत भारतीय संघातील एका फलंदाजानं शतक साकारलं. २०१२ मध्ये सचिन आणि आता गिलनं शतकी खेळी उभारली. पण या दोन्ही सामन्यांत भारताचा पराभव झाला.