मुंबई : गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या खासगी बसचालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले, तर नागरिकांनी स्थानिक आरटीओ कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त जे बी पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शुक्रवारी घोषणा केली, की ते कोकणासाठी ३ हजार ८४६ बस चालवणार आहेत. मुंबई सेंट्रल ते कणकवलीचे भाडे ६७५ रुपये, रत्नागिरीपर्यंत ५३० रुपये, चिपळूणपर्यंत ४०० रुपये, सावंतवाडीपर्यंत ७४५ रुपये आणि मालवणपर्यंत ७२० रुपये आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
“कोकणात जाण्यासाठी खाजगी बसेस नॉन-एसीसाठी २००० रुपये, तर एसी प्रवासासाठी २५०० रुपये आकारत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. खासगी बस चालकांनी अतिरिक्त शुल्क आकारल्यास, अशा ऑपरेटर्सविरुद्ध तक्रार करावी” असे एसटीच्या प्रवक्त्याने सांगितले.
सरकारी नियमांनुसार, खाजगी ऑपरेटर प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या भाड्याच्या दीडपटीहून अधिक शुल्क आकारु शकत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
सह परिवहन आयुक्त जे बी पाटील म्हणाले, “कोकणात खाजगी वाहने चालवणाऱ्यांनी, वाहन धारकांनी पुरेशी विश्रांती घ्यावी आणि कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सावधपणे वाहन चालवावे.”