सायली सौरभ भागवत (वय २२, रा. दत्तवाडी, पुणे) असे या मयत झालेल्या सुनेचं नाव आहे. या प्रकरणी सासू राजेश्री राजेंद्र भागवत (साईबाबा मंदिर शेजारी, दत्तवाडी पोलीस चौकी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवी अनिल अहिरे ( वय ३९, रा, हिराबाग पुणे) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली सौरभ भागवत हिचा राजेश्री राजेंद्र भागवत हिच्या मुलाशी एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सासू राजेश्री ही सायली हिला वारंवार टोमणे देऊन तिचा मानसिक छळ करायची. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खालच्या पातळीचे शब्द प्रयोग सातत्याने करायची, असा आरोप आहे.
घटना घडली त्या दिवशी, सासू राजेश्री हिने हीन दर्जची वागणूक देऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला तू झोपडपट्टीमध्ये राहणारी चिंधी चोर आहेस, तुला स्वयंपाक नीट बनवता येत नाही, असे म्हणत तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.
त्यासोबत सुनेला उपाशी पोटी ठेऊन, तिच्या नवऱ्यापासून अलिप्त राहण्यास भाग पाडले, तसेच तिला रात्री दोन वाजताच्या सुमारास घराबाहेर हाकलून दिले. या जाचाला कंटाळून सायली हिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या बाबत पुढील तपास खडक पोलीस स्टेशनचे पोलीस एल एन सोनवणे करत आहेत.