मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांविरोधात बॉलिवूडमधून आवाज उठवणाऱ्यांमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप आघाडीवर असतो. अनुरागने विविध मुद्द्यांवरुन उघडपणे मोदी सरकावर टीका केली आहे. आता भाजप नेत्यानं अनुरागचं एक पत्र व्हायरल करुन त्याचा मोदी विरोध ढोंगी असल्याचा आरोप केला आहे.
‘अनुराग कश्यपने त्याच्या चित्रपटांना अनुदान मिळावं यासाठी केंद्राला पत्र लिहीलं होतं. पण मारहाणीच्या चित्रपटांना अनुदान न मिळाल्याने कश्यप सरकारविरोधात अपशब्द बोलू लागले आहेत. याआधीच्या सरकारकडून कश्यप यांच्या फ्लॉप चित्रपटांनाही कोट्यवधींचं अनुदान दिलं जात होतं. योगी आदित्यनाथ यांनी फुकटची मदत देणं थांबवलं आणि तो पैसा गरीब, विधवा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरला, तर यांचा संताप होऊ लागला आहे’, असं ट्विट भाजपचे प्रवक्ते शलभ मणी त्रिपाठी यांनी केलं आहे. याशिवाय, ट्विटसोबत कश्यप यांनी सरकारकडे केलेली मागणी पत्रेही त्रिपाठी यांनी जोडली आहेत.
त्रिपाठी यांच्या आरोपांना अनुरागनेही प्रत्युत्तर दिलं. ‘योगी आदित्यनाथ सरकारने मला चर्चा आणि प्रमोशनसाठी दोनवेळा निमंत्रण दिलं होतं. पण मी ते नाकारलं. कारण यामागच्या त्यांचा उद्देशाची मला कल्पना होती. माझ्यातील आत्मसन्मान अजूनही जिवंत आहे’, असं अनुरागने ट्विट केलंय. ट्विटमध्ये ‘साँड की आँख’ या चित्रपटाला योगी सरकारच्याच काळात ‘टॅक्स फ्री’ केल्याच पत्र देखील अनुरागने ट्विट केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times