ठाणे: गणेशोत्सवासाठी कोकणाच्या दिशेने रेल्वेने अनेक विशेष रेल्वेगाड्या सोडल्या असल्या तरी या गाड्यांची संख्या पुरेशी नसल्याचे समोर आले आहे. याचे प्रत्यंततर नुकतेच दिवा रेल्वे स्थानकात आले. मंगळवारी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यापूर्वीच आपापल्या गावी जाण्यासाठी चाकरमन्यांची लगबग सुरु आहे. या कोकणात निघालेल्या प्रवाशांची मोठी गर्दी दिवा स्थानकात पाहायला मिळाली. गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष गाडी दिवा स्थानकातून सोडण्यात आली होती. यावेळी गाडीच्या दुतर्फा असलेले दोन्ही रेल्वे फलाट गर्दीने फुलून गेले होते. दुतर्फा लोकांची गर्दी आणि मध्यभागातून पुढे सरकारची ट्रेन असे दृश्य असणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या एका दृश्यावरुन कोकणातील गणेशभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने केलेले नियोजन किती तोकडे पडणार आहे, याची कल्पना येऊ शकते. याशिवाय, कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांचे वेळापत्रकही पूर्णपणे कोलमडले आहे. गावी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांना चार-चार तास स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या सगळ्या गलथान कारभाराबाबत प्रवाशांकडून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टोलमाफी असतानाही एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांच्या फास्टॅगमधून पैसे कट, सरकारची घोषणा फसवी?

दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात दोन एसी डबे जोडण्यात आले. मात्र त्याचे आरक्षण कधी सुरु होणार ते नियोजन करून वेळेत प्रसारित करण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांना या डब्यांची प्रतीक्षा करावी लागली. आरक्षण ऑनलाईन दिसताच काही मिनिटातच हे डबे गणेशभक्तांकडून फुल्ल झाले. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरती अनेक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरून ०९००९ मुंबई सेंट्रल सावंतवाडी गणपती स्पेशल १५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजता ही स्पेशल ट्रेन पनवेल रेल्वे रेल्वे स्थानकात दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पनवेल येथे आल्यावर एसी व स्लीपर कोचच्या डब्यांमध्ये अचानक बदल केला गेला व ट्रेन अवघ्या तीन मिनिटात सुटल्याने अनेक कुटुंबांची तारांबळ उडाली. त्यामुळे अक्षरशः चेन खेचून ट्रेन थांबवण्याची वेळ प्रवाशांवर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान सीएसएमटी, दादर, ठाणे येथे अनेकदा आयत्यावेळी हा डब्यांचा बदललेला क्रम जाहीर केला जातो. विशेषतः मान्सून टाईम टेबल नंतर आणि वंदे भारत सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती आणखी वाढली आहे अशी महत्त्वाची प्रतिक्रिया चिपळूण येथील प्रवासी डॉक्टर मिलिंद गोखले यांनी ‘मटा’ ला जवळ बोलताना दिली.

Maharashtra Weather Forecast: हलक्या सरींमध्ये बाप्पाचे आगमन? तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

पनवेल रेल्वेस्थानकात शुक्रवारी मध्यरात्री मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सावंतवाडीला जाणारी स्पेशल एक्सप्रेस रेल्वे सकाळी सव्वाआठ वाजता आली. हाच अनुभव दिवा रेल्वे स्थानकातही प्रवाशांना येत आहे. नेमका खोळंबा व हा सगळा गोंधळ कशामुळे झाला याचे उत्तर प्रवाशांना स्थानकात दिले जात नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्यापेक्षा ट्रेनचा प्रवास हा सोपा व जलद असतो त्यामुळे अनेक जणांचा ट्रेनच्या आरक्षणाकडे स्वाभाविकपणे कल आहे. मात्र कोकणात येणाऱ्या गाड्यांचे नियोजन व व्यवस्थापन योग्य प्रकारे रेल्वे प्रशासनाकडून कोकण व्यवसायांना कोणत्याही त्रास होणार नाही या प्रकारे अनेकदा केले जात नसल्याचा आरोप कोकणातील प्रवासी संजय सावंत यांनी केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून गणेश उत्सवासाठी विशेष गाड्या सोडण्यात आले असल्या तरी पनवेल व दिवा रेल्वे स्थानकात होणाऱ्या त्रासामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here