ठाणे: कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील शहाड ते आंबिवली दरम्यान रेल्वे रुळावर एका ४६ वर्षीय महिला आढळून आल्याची घटना समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांना ही आत्महत्या असल्याचे आढळून आले असून महिलेने अवघ्या चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ती राहत असलेल्या परिसरातील सावकरांकडून होणाऱ्या छळाची तक्रार केली होती. तर दुसऱ्या घटनेत कसारा येथे एका प्रेमीयुगलानेही घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून कल्याण लोहमार्ग पोलीस आणि कसारा पोलीस पथकाने तपास सुरू केला आहे.
एकतर्फी प्रेमातून रिक्षाचालकाचा रोजचाच त्रास; १५ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला अखेरचा निर्णय अन्…
पहिल्या घटनेत, कल्याण रेल्वे पोलिसांना गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास आंबवली आणि शहाड स्थानकादरम्यान मालगाडीने एका महिलेला धडकल्याचा फोन आला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस पथक घटनास्थळी होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिलेच्या मृतदेहाजवळून पोलिसांना दिलेली तक्रारीची प्रत सापडली. ही महिला शहाड येथील रहिवासी असून तिला दोन मुले असून पती कपड्याच्या दुकानात काम करतात.

या घटनेचा तपास करणाऱ्या पीआय अर्चना दुसाने म्हणाल्या, “मालगाडीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेने चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका सावकाराकडून दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी सावकाराने छळ केल्याची तक्रार नोंदवली होती. महिलेचा मृत्यू झाल्यावर त्या तक्रारीची प्रत रेल्वे पोलिसांना मिळाली आहे. मात्र मृताच्या कुटुंबियांनी कोणाच्याही विरोधात तक्रार न केल्यामुळे आम्ही अपघाती मृत्यूची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणात जाण्यासाठी चाकरमानी निघाले; अवजड वाहनांची मोठी संख्या, महामार्गावर ट्रॅफिक जॅम

दुसऱ्या घटनेत कसारा येथील वीर तानाजीनगरमधील एका बंद खोलीत तरुण तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमनाथ सोनवणे(२३) आणि सुजाता देशमुख (२१) असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे असून दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवाशी होते. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक सोमनाथ व सुजाता यांच्यात प्रेम संबंध असल्याने दोघेही मूळ गावातील घर सोडून गेल्या दीड महिन्यांपासून दोघेही भाडेतत्त्वावर कसारा येथे तानाजीनगरमध्ये राहत होते. दोन दिवसांपूर्वी सोमनाथ आणि सुजाता यांनी बंद खोलीत घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृतदेहांजवळ कुठलाही पुरावा मिळून न आल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here