विशेष रेल्वे, जादा एसटीसह नियमित धावणाऱ्या रेल्वे-एसटी फेऱ्यांसह खासगी गाडीने जवळपास सहा लाख नागरिक कोकणात दाखल झाल्याचा अंदाज परिवहन आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. एसटी महामंडळाने यंदाच्या उत्सवासाठी गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार अधिक गाड्या अर्थात एकूण तीन हजार ५०० गाड्या सोडल्या. यापैकी ११०० गाड्या शनिवार-रविवारी कोकणाच्या दिशेने रवाना झाल्या. सोमवारी मुंबईहून ६८ जादा एसटी मार्गस्थ करण्याचे नियोजन आहे. दरम्यान खराब रस्त्यांमुळे एसटीचे अपघात झाले, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
मुंबई-कोकण महामार्गातील काही टप्प्यांत रस्त्यांचे काम झाले आहे. मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गर्दी असली तरी कोकणाहून मुंबईकडे येणारा मार्ग रिकामा होता. यंत्रणांनी रिकाम्या मार्गावरील एक मार्गिकेचा वापर करायला होता. मात्र, प्रत्यक्षात तो झाला नसल्याने गणेशभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागला, असे प्रवाशांनी सांगितले.
१० तासांचा प्रवास १५ तासांवर
मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर पार करण्यासाठी एरवी बारा तास लागतात. मात्र शनिवार-रविवारी या अंतरासाठी १५ ते १६ तास लागले. महामार्ग नको, किमान खड्डेमुक्त साधा रस्ता द्यावा, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केल्या.
डोंबिवली-राजापूर विशेष एसटी
अपघात ठिकाण : रेपोली पेट्रोल पंप, माणगाव-लोणेरेदरम्यान
वेळ : पहाटे ४.१५
कारण : चालकाचे रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष
प्रवासी संख्या : ३८ (मृत्यू – १, जखमी-३७)
रायगड-पेण विशेष एसटी
अपघात ठिकाण : वडखळ पूल
वेळ – पहाटे ५.३०वा.
कारण – त्रयस्थ वाहनचालकाचे रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष
प्रवासी संख्या : १५ (८ गंभीर आणि ४ किरकोळ दुखापत)
बोरिवली ते गुहागर आणि दिवा-कोळबंदरे विशेष एसटी
अपघात ठिकाण : हॉटेल ऐश्वर्यासमोर, निडी गावाजवळ
वेळ : पहाटे ५.३०वा.
कारण : वाहनांत सुरक्षित अंतर न ठेवल्याने मागून धडक
प्रवासी संख्या : ९० (९ किरकोळ दुखापत)
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी टाळणे आणि तातडीने मदत मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलिस, एसटी महामंडळ, वाहतूक पोलिस, वैद्यकीय यंत्रणा अशा यंत्रणा सज्ज आहेत. मात्र सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव होता. याचा फटका लाखो प्रवाशांना बसला आहे. कशेडी घाट सुरू केला, मात्र त्यात वायुविजनची (व्हेंटिलेशन) सुविधा उपलब्ध नाही.
– अॅड. ओवेस पेचकर, मुंबई-गोवा महामार्ग